प्रकाश आंबेडकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसेल तर वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचेही स्पष्ट केले. आमच्याशिवाय या सरकारविरोधा कुणीही लढणार नाही. व्हीव्हीपॅट नसेल तर आम्ही निवडणुकीत सहभागी होणार नाही. व्हीव्हीपॅट असेल तरच निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे. पण विरोधक या घडामोडीत कुठेच दिसत नाहीत. त्यांना कुणी विचारतही नाही, असे ते म्हणाले.
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत. ते त्यातून केव्हाच बाहेर पडू शकणार नाहीत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाचे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.प्रकाश आंबेडकर गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, विरोधी पक्षांना लकवा मारला आहे. संपूर्ण जग भारताला घेरण्याच्या भूमिकेत आहे. यामुळे व्यक्ती की देश हा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे सर्वकाही एकट्या नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाले आहे. देशाला या स्थितीतून बाहेर काढायचे असेल तर नरेंद्र मोदी याच्या पक्षाला सत्तेत येऊ देता कामा नये. मतदार त्यांना बळी पडले, तर देशाचा बळी जाईल. त्यामुळे मतदार शहाणपणाने वागणार की नाही हे त्यांनाच ठरवायचे आहे.
देशाचे नेतृत्व करण्यासाठी पर्याय कोण? यावर विचार करण्याची गरज नाही. आपल्याला केवळ नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षापासून भारताला वाचवायचे आहे. 140 कोटींमधून कुणीही पुढे येऊन देश चालवू शकतो. ही ताकद व हिंमत आपल्यात आहे यावर विश्वास ठेवा. नरेंद्र मोदी निवृत्त झाले तर चांगलेच आहे. त्यांच्यामुळेच देशाला घेरले जात आहे. ते निवृत्त झाले तर देशाला घेरण्याचा प्रयत्न थांबेल.
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी शरद पवार हे भाजपचे हस्तक असल्याचाही गंभीर आरोप केला. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत असली तरी शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत. ते त्यातून कधीही बाहेर पडू शकत नाहीत. देश पातळीवर घडामोडी करणारे लोक वेगळे आहेत. तुमच्यापुढे असणारे लोक वेगळे आहेत. राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यात मोदींना आव्हान देण्याची हिंमत आहे का? या विरोधकांना लकवा मारल्यामुळे ते मोदींना विरोध करू शकत नाहीत. पण 15 दिवस देशाच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे, असे आंबेडकर म्हणाले.

