निवडणूक आयोगाचा सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा निर्णय संशयास्पद
नवी दिल्ली-काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात अवघ्या 5 महिन्यांत 5 वर्षांहून अधिक मतदारांची मतदार यादीत भर पडली. विशेषतः एकाच मतदाराने महाराष्ट्रासह कर्नाटक व उत्तर प्रदेशातही लागोपाठ मतदान केले. या गैरव्यवहारात भाजप व निवडणूक आयोगाने हातात हात घालून काम केले, असे ते म्हणाले. राहुल यांनी यासंबंधी काही ठोस पुरावेही सादर केलेत.
राहुल गांधी यांची आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात अवघ्या 5 महिन्यांत 5 वर्षांपेक्षा जास्त मतदारांची भर पडली. यामुळे आमचा संशय बळावला. त्यातच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेनंतरच्या टक्केवारीत अचानक मोठी वाढ झाल्याने हा संशय अधिक गडद झाला. कारण, लोकसभा निवडणुकीत आमच्या आघाडीला मोठे यश मिळाले होते. पण विधानसभेत आमचा सफाया झाला. हे खूपच संशयास्पद होते.
त्यानंतर आम्ही त्याचा शोध घेतला. त्यात लोकसभा व विधानसभा या दोन निवडणुकांमधील काळात तब्बल 1 कोटी नव्या मतदारांची वाढ झाल्याची बाब आमच्या निदर्शनास आली. आम्ही याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. लेख लिहिले. महाराष्ट्रातील मतदान चोरीला गेल्याचा आमचा एकंदरीत सूर होता, असे ते म्हणाले.
समस्येचे मूळ काय आहे? मतदार यादी ही या देशाची मालमत्ता आहे. पण त्यानंतरही निवडणूक आयोगाने आम्हाला ती देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी एक मोठी रंजक गोष्ट केली. आयोगाने सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा निर्णय घेतला. हे आमच्यासाठी अत्यंत आश्चर्यकारक होते. कारण, महाराष्ट्रात सायंकाळी 5.30 वाजेनंतर मोठ्या प्रमाणात संशयास्पद मतदान झाल्यामुळे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
वस्तुतः मतदान केंद्रांवर सायंकाळी 5.30 नंतर कोणतेही मोठे मतदान झाले नव्हते. ही बाब आमच्या लोकांना माहिती होती. या दोन गोष्टींमुळे भारतीय निवडणूक आयोगाने भाजपशी संधान साधून मतदान चोरल्याची आमची खात्री पटली, असेही राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या मतदार यादीत 40 लाख गूढ मतदार आढळल्याचाही आरोप केला. याविषयी त्यांनी आदित्य श्रीवास्तव नामक एका मतदाराचे उदाहरण दिले. या मतदाराने महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश व कर्नाटकातही मतदान केल्याचे निष्पन्न झाले. या तिन्ही राज्यांच्या मतदार यादीत या व्यक्तीचे नाव होते. याचा अर्थ या व्यक्तीने आळीपाळी तिन्ही राज्यांतील निवडणुकांत मतदान केले. राहुल गांधी यांनी यावेळी त्याचे पुरावेही दाखवले. आम्ही निवडणूक आयोगाकडे डेटा मागितला. पण त्यांनी दिला नाही. आता आम्ही निवडणुकीतील गैरप्रकाराचे त्यांना थेट पुरावेच दिलेत, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी यावेळी भाजप व निवडणूक आयोगाने विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका व लोकसभेतील मते चोरल्याचाही आरोप केला. आम्हाला निवडणुकीचे निकाल आल्यापासूनच दाल में कुछ काला है असे वाटत होते. पण भाजपाला अँटी इन्कम्पन्सी वाटत नव्हती. त्यामागे हे कारण होते. मतचोरी ही भारताविरोधातील व भारतीय राज्य घटनेविरोधात रचण्यात आलेला सर्वात मोठा गुन्हा आहे, असे ते म्हणाले.

