पुणे:मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या प्रस्तावास मान्यता मिळाली असून ते होण्यासाठी पाठपुरावा करू असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांतदादा म्हणाले की,मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या दशकांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, न्यायदानाचा मार्ग आता अधिक सुकर होईल, असा विश्वास व्यक्त करतो.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या तिघांनीही मोठे योगदान दिले. त्यामुळे तिघांचेही मनापासून आभार मानतो. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांचा विचार करुन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई जी, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे जी यांचेही सर्किट बेंचच्या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल अतिशय मनापासून आभार मानतो. नागरिक तसेच वकिलांचेही मन:पूर्वक अभिनंदन!
पुणे बेंचसाठी कायदे तज्ज्ञांच्या स्थानिक शिष्टमंडळानेही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली आहे. त्यावर मार्ग काढण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे. त्यामुळे त्यासाठीही पाठपुरावा करू, अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.

