पुणे : वर्षा ऋतुनिमित्त भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे आयोजित ‘मेघरंग’ या कार्यक्रमात मल्हार रागाच्या विविध छटा गायन-वादनातून उमटल्या. गौड मल्हार, मल्हार, सूर मल्हार, मियाँ मल्हार, मेघ, जयत कल्याण अशा रागातील रचना सादर करण्यात आल्या.
विष्णू विनायक स्वरमंदिरात दोन दिवसीय ‘मेघरंग’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका विदुषी मीरा पणशीकर, निवृत्त आयकर आयुक्त डॉ. राजीव रानडे (आयआरएस), महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे, अपर्णा पणशीकर, पंडित सुरेश बापट यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांची तर दुसऱ्या दिवशी संगीत प्रेमी, सीजीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे (आयआरएस), संगीतप्रेमी, एसआरपीएफ कमांडंट तेजस्वी सातपुते (आयपीएस) यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अपर्णा पणशीकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी गौड मल्हार रागातील ताल तिलवाडामध्ये ‘काहे हो’ हा बडा ख्याल सादर केला. त्यानंतर स्वत: रचलेली एक बंदिश ऐकविली. ‘बलमा बहार आयी’ ही रचना सादर करून त्याला जोडून द्रुत तालातील ‘जर झरन झरन’ आणि ‘अब रसिला’ ही मल्हार रागातील रचना सादर करून रसिकांना मल्हार रागांचा आनंद दिला.
ग्वाल्हेर-आग्रा घराण्याचे गायक पंडित सुरेश बापट यांनी मैफलीची सुरुवात जयत कल्याण रागातील , विलंबित तीन तालातील ‘पपीहा न बोल’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्यानंतर मास्टर कृष्णराव यांची ‘बरसन बरसन लागी चहू’ ही रचना सादर केली. यानंतर मियाँ मल्हार मधील मध्य लय झपतालातील ‘आयो है मेह नही’सह द्रुत तालातील ‘कहे लाडली’ या रचना सादर केल्यानंतर सूर मल्हारमधील, मध्य लय रूपक तालातील ‘गढ दे बीर’ आणि द्रुत एकतालातील प्रल्हाद गानू यांची ‘आए बदरा कारी कारी’ या रचना रसिकांना ऐकविल्या.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात रोहित मराठे यांच्या संवादिनी वादनाने झाली. त्यांनी मियाँ मल्हार रागातील सुनंद तालातील साडेनऊ मात्रांची रचना प्रभावीपणे सादर केली. त्यानंतर द्रुत एकतालातील रचना सादर करून राग मेघमधील द्रुत तीनताल सादर केला. गौड मल्हार रागातील झपतालातील रचना सादर करून संवादिनी वादनाची सांगता केली.
त्यानंतर सुप्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी यांनी मैहर घराण्याचे वैशिष्ट्य असलेल्या अप्रचलित देस मल्हार रागातील आलाप, विलंबित गत, द्रुत गत आणि झाला यांची सुंदर मांडणी केली. सरोद या वाद्यावर महाराष्ट्रातील अभंगमालांच्या रचना वाजविणारे जगातील एकमेव वादक असलेल्या अनुपम जोशी यांनी ‘कानडाऊ विठ्ठलु’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘खेळ मांडियेला’, ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगांची झलक ऐकविली. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली.
जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी जुई धायगुडे-पांडे यांनी गायनाची सुरुवात गौड मल्हार रागातील, विलंबित तीन तालातील ‘मान न करीये गोरी तुमरे कारन आयो मेहा’ या बंदिशीने केली. त्यानंतर द्रुत तीनतालात गानसरस्वती किशोरी अमोणकर रचित ‘बरखा बैरी भयो सजनिया’ ही रचना सादर केली. त्यानंतर मीरा मल्हार रागातील, विलंबित रूपकातील ‘तुम घन से घनशाम घटा घन’ ही बंदिश ऐकविली. त्याला जोडून द्रुत तीन तालातील ‘बरसन को आये’ही रचना सुरेलपणे सादर करत कार्यक्रमाची सांगता केली.
कलाकारांना संजय देशपांडे, ऋषिकेश जगताप, प्रणव गुरव (तबला), पंडित प्रमोद मराठे, लीलाधर चक्रदेव, अमेय बिच्चू (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. सूत्रसंचालन स्वानंदी गिरीश यांनी केले.

