मुंबई –आपण आंब्याच्या कोया आणि इतर फळझाडांच्या बिया लावण्यापूर्वी त्या पाण्यात टाकून बघाव्यात.त्या तरंगल्या तर समजायचे,या कोया आणि बिया निरुपयोगी आहेत. पण जर त्या बुडाल्या तर त्या लावण्यायोग्य हे समजून त्या
लावाव्यात असे प्रात्यक्षिकासह मौलिक मार्गदर्शन,वृक्षतज्ञ विजयकुमार कट्टी यांनी नुकतेच केले.नवी मुंबई येथील पर्यावरण तज्ज्ञ सुधीर थोरवे आणि पर्यावरण प्रेमी मंडळीनी रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळील टेकडीवर आयोजित केलेल्या वृक्षारोपण प्रसंगी श्री कट्टी बोलत होते.
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने गेली दोन महिने घरी
जमवलेल्या आंब्याच्या कोया, जांभळाच्या ,फणसाच्या, सीताफळाच्या बिया घेऊन मोठ्या हौसेने माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ आले होते.या कोया आणि बिया कुठे लावणे योग्य ठरेल ? असे त्यांनी कट्टी यांना विचारले असता,प्रथम त्यांनी वृक्षारोपणासाठी तयार केलेल्या आणि पावसाचे पाणी जमलेल्या एका खड्ड्यात एकेक कोय टाकण्यास सुरुवात केली आणि प्रत्येक कोय बुडत गेली. कोयांची ज्या पद्धतीने काळजी घ्यायला हवी होती ती न घेतली गेल्याने असे झाले आहे, असे सांगून त्यांनी
कोयांची ,शास्त्रीय पद्धतीने कशी काळजी घ्यावी हे,उपस्थित सर्वांना समजावून सांगितले.सुदैवाने आणलेल्या बिया मात्र बुडाल्याने,त्या सर्व लावण्यात आल्या.
या बरोबरच कट्टी यांनी उपस्थित गृहिणींना ,त्यांनी स्वयंपाकात शेंगदाणे वापरण्यापूर्वी ते पाण्यात टाकून बघावेत आणि ते बुडाले तरच वापरावेत,अशी
“अंदर की बात” सांगितली!
या प्रसंगी नुकतेच दिवंगत झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांच्या स्मरणार्थही वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपणासाठी वनाधिकारी समीर खेडकर, जितेंद्र चव्हाण, कर्जत येथील शरद पवार, विलास आचरेकर,आमदार महेंद्र थोरवे यांचे सहायक राजू थोरवे यांचे सहकार्य लाभले.
श्री सुधीर थोरवे आणि त्यांचे
सम विचारी गेल्या १२ वर्षांपासून वन विभागाच्या सहकार्याने या टेकडीवर वृक्षारोपण करीत आहेत.
७ जणांपासून सुरू झालेला हा समूह आता ७५ पर्यंत गेला आहे.यावेळच्या ७५ जणांमध्ये
सम विचारी स्त्री,पुरुषच नव्हे तर आबाल वृद्ध देखील सहभागी झाल्याने एक प्रकारच्या कौटुंबिक वातावरणात हे वृक्षारोपण झाले. या अनौपचारिक उपक्रमाला निश्चित स्वरूप यावे म्हणून एका फाउंडेशनची स्थापना करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

