श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या छत्रपती ताराबाई वसतीगृहाचे भूमिपूजन
पुणे : छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन कार्य सुरू केले, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे ठरले ते वसतीगृह. त्या काळातही शिक्षणाची पायाभरणी होण्यासाठी वसतीगृह महत्त्वाचे ठरले, आजही वसतीगृहाचे महत्त्व आहे. या वसतिगृहाच्या माध्यमातूनच शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आणि शिक्षणाची ज्योत पेटवली गेली. बहुजन समाज एकत्र येऊन काम करत राहिल्यास सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आपल्या समाजात आहे. राजर्षी शाहू महाराजांमुळे बहुजन समाज आपल्या पायावर उभा राहू शकला आहे, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शिवाजीनगर मधील छत्रपती ताराबाई वसतीगृहाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी पुनीत बालन ग्रुपचे संचालक पुनीत बालन, माणिकचंद ग्रुपच्या जान्हवी बालन यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, प्रमिला गायकवाड, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, सत्येंद्र कांचन, विलास गव्हाणे यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराज म्हणाले, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्नुषा ताराबाई यांच्या नावाने वसतीगृहाची पायाभरणी झाली आहे ही चांगली गोष्ट आहे. शिक्षण हे एक असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये जितके काम करू तितके कमी आहे. इतर शैक्षणिक संस्थेच्या बरोबरीने किंवा पुढे जायचे असेल तर सामाजिक आणि वैचारिक लोकांनी यामध्ये अधिक लक्ष घालून जोमाने काम पुढे न्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
पुनीत बालन म्हणाले, पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच गरजू लोकांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असतो. छत्रपती ताराबाई वसतीगृहाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. अण्णा थोरात यांनी प्रास्ताविक केले. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले.

