पुणे- कात्रज भागातील एका दोन वर्षांच्या मुलीचे भीक मागण्यासाठी अपहरण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अपहरण करणाऱ्या या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत अटक केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून या चिमुकलीची सुखरूप सुटका देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून, यात एका महिलेचा देखील समावेश आहे.
सुनील सीताराम भोसले (51), शंकर उजण्या पवार (50), शालुबाई प्रकाश काळे (45), गणेश बाबू पवार (35), मंगल हरफुल काळे (19), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी तुळजापूर येथील मोतीझारा इथले रहिवासी आहेत. धनसिंग हनुमंत काळे (25) यांच्या फिर्यादिवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
फिर्यादी धनसिंग हनुमंत काळे हे आपल्या कुटुंबासह कात्रज येथील वंडर सिटी परिसरातील झोपडी वजा घरात राहतात. त्यांना चार अपत्य असून त्यात दोन वर्षाच्या जुळ्या मुली आहेत. 25 जुलैच्या रात्रीच्या सुमारास संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना, यातील दोन वर्षांच्या चिमूकलीला झोपाळ्यातून उचलून अपहरण करण्यात आले. मध्यरात्री जंग आल्यावर हनुमंत यांच्या ही बाब लक्षात आली व तातडीने त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाणे गाठले व अपहरणाची तक्रार दाखल केली.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चिमुकलीच्या शोधासाठी तातडीने पाठक पाठवण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनात दोन तपास पथके तयार करण्यात आली. याशिवाय गुन्हे शाखेने स्वतंत्र तपासपथक कार्यरत केले. तपास करताना वंडर सिटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात तीन जण एका दुचाकीवर मुलीसह जाताना दिसून आले. कात्रज ते रेल्वे स्थानक परिसरातील जवळपास 140 सीसीटीव्ही तपासले, त्यात रेल्वे स्थानकावरील फुटेजमध्ये आणखी दोन आरोपी असल्याचे दिसून आले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास पथक तुळजापूरला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने सुरुवातील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून अपहरण झालेल्या चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच पुढील चौकशी करत उर्वरित दोन आरोपींना देखील अटक करण्यात आली. या आरोपींची कसून चौकशी केली असता, भीक मागण्यासाठीच आपण अपहरण केल्याची कबुली दिली. या पाचही आरोपींना पुण्यात आणून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 2 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

