मुंबई–केरळच्या कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान आज सकाळी मुंबई विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अहमदाबाद विमानतळावर घडलेल्या घटनेच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत.\मुंबईत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे रनवेवर काही ठिकाणी पाणी साचले आहे. परिणामी, विमानाच्या उड्डाणांत व लँडिंगच्यावेळी अनेक अडचणी येत आहेत. विशेषतः यामुळे काही विमाने रद्द करण्याची वेळ आली आहे, तर काहींना विलंबाने उड्डाण करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली आहे. या घटनेत विमान घसरून रनवेपासून 16-17 मीटर दूर गेल्याची माहिती आहे.यासंबंधीच्या माहितीनुसार, ही दुर्घटना सोमवारी सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी घडली. या घटनेत विमानाचे 3 टायर फुटलेत. यात मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टीचे 09/27 देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे ती उड्डाणासाठी बंद करण्यात आली आहे. दुसरी धावपट्टी 14/32 वरून विमान वाहतूक सुरू ठेवण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) एक पथक विमानतळावर पोहोचले आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, एअर इंडियाचे AI2744 विमान सोमवारी सकाळी मुंबई विमानतळावर उतरताना पावसामुळे धावपट्टीवरून घसरले. हे विमान कोच्चीहून मुंबईला येत होते. या अनपेक्षित घटनेमुळे हे विमान काही क्षण अनियंत्रित झाले. पण वैमानिकाने प्रसंगावधान राखून त्यावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. विमान सुरक्षितपणे लँड झाले. सर्व प्रवासी व क्रू सदस्य सुखरूप आहेत. विमान कंपनीने सांगितले की, विमानाला सुरक्षितपणे हँगरपर्यंत पोहोचवण्यात आले. सर्वच यात्री व क्रू सदस्यांना उतरवण्यात आले. विमानाला आता पुढील तपासासाठी ग्राऊंड करम्यात आले आहे. या प्रकरणी आवश्यक ती सुरक्षा तपासणी केली जात आहे.
पावसाळ्यात मुंबई विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये, विशाखापट्टणमहून येणारे व्हीएसआर व्हेंचर्स लिअरजेट 45 विमान मुसळधार पाऊस व कमी दृश्यमानतेमुळे धावपट्टीवरून घसरले होते. त्यानंतर खराब झालेले हे विमान बाहेर काढण्यासाठी अनेक तास लागले होते.
गत सोमवारी ट्रक विमानाला धडकला होता
उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गत सोमवारी (14 जुलै) एका मालवाहू ट्रकने अकासा एअरलाईन्सच्या विमानाला धडक दिली होती. यामुळे विमानाचे अंशतः नुकसान झाले होते. ही घटना घडली त्यावेळी एक थर्ड पार्टी ग्राउंड हँडलर हे वाहन चालवत होता. घटनेनंतर विमान कंपनीने या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले होते. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी विमान चालू नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती
अहमदाबाद विमानतळावर घडली होती दुर्घटना
तत्पूर्वी, गत महिन्यात गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे एक विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले होते. त्यात जवळपास 260 जणांचा बळी गेला होता. हे विमान अहमदाबादवरून लंडनच्या दिशेने झेपावले होते. पण उड्डाणानंतर अवघ्या 39 सेकंदांतच ते विमानतळ परिसरातील एका मेडीकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळले. हे विमान कोसळले तेव्हा या वसतीगृहाच्या मेसमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर जेवण करत होते. त्यात ते ही मारले गेले. आजच्या घटनेमुळे या अपघाताच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत.

