मुंबई-मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जसे एकत्र आले तसे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात, असे विधान सरनाईक यांनी केले आहे. त्यामुळे आता युतीच्या चर्चा चांगल्याच रंगत असल्याचे दिसत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकते, येत्या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात.महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला होता. जवळपास 20 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे विधान केले आहे.
दरम्यान, सध्या आमदारांचे वादग्रस्त व्हिडिओ समोर येत आहेत. यावर देखील प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमच्या पक्षातील आमदारांकडून काही विधाने करण्यात आले, त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. शिंदेंनी आमदारांना सक्त सूचना देखील दिल्या आहेत. आमच्याच आमदारांच्या तक्रारी आहेत असे नाही. सगळ्या पक्षातील आमदार बोलतात.
उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर चांगलाच हल्लाबोल केला होता. जादूटोणा करून आमदार निवडून आले, असे त्यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक म्हणाले, तुमचे आमदार निवडून आले हे काय जादूटोणा न करता आले? आणि आमचे जादूटोणा करून आले का? तुमचे लोकसभेला खासदार जादूटोणा करूनच निवडून आले होते का? असा सवाल सरनाईक यांनी यावेळी केला. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ब्रँड आहेत. आमच्या पक्षाचा ब्रँड म्हणजे एकनाथ शिंदे, असेही यावेळी सरनाईक यांनी म्हटले आहे.

