मुंबई-महाविकास आघाडीचे सरकार उलथावून सत्तेत आलेले एकनाथ शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे आल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी केला. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत हनीट्रॅपचे आरोप फेटाळले. पण सरकार व विरोधकांकडे याविषयी मोठी माहिती आहे. त्याचे पुरावे द्यायचे झाले तर तिकीट आम्हाला तिकीट लावावे लागेल. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे सरकाही नाशिकच्या सीडीमुळेच आले होते, असे ते म्हणालेत. वडेट्टीवार यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गुरूवारी विधानसभेच्या पटलावर मंत्रालय, नाशिक व ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी एक पेन ड्राईव्हही सभागृहात दाखवले होते. विधानसभा अध्यक्षांनी सरकारला हनीट्रॅपच्या मुद्यावर निवेदन करण्याचे सांगितले. पण त्यांच्या सूचनेनंतरही सरकारने त्यावर निवेदन केले नाही. या प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी होत आहे. मंत्रालय, नाशिक व ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहे. राज्याचे महत्त्वाचे दस्तऐवज या समाजविघातक संघटनाच्या हाती जात आहेत. मी कुणाचेही चारित्र्यहनन करत नाही. माझ्याकडे पेन ड्राईव्हही आहे. मला ते दाखवायचे नाही. पण एवढ्या गंभीर प्रकरणात सरकार निवेदन करण्यास तयार नाही हा माझा आरोप आहे, असे ते म्हणाले होते.
नाना पटोले यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आरोप फेटाळले होते. ना हनी आहे ना ट्रॅप. आमच्यापर्यंत नाना पटोलेंचे बॉम्ब पोहोचलाच नाही, असे ते या आरोपांची खिल्ली उडवत म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त दावा केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री काल हनीही नाही आणि ट्रॅपही नाही असे म्हणाले. पण त्यासंदर्भात सरकार व विरोधकांकडे फार मोठी माहिती आहे. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा कुणाला अधिकार नाही म्हणून आम्ही शांत आहोत. पण मागच्यावेळेस शिंदे सरकार जे आले, ते अशाच नाशिकच्या प्रकरणामुळे आले. जे काही सत्तापालट झाले ते सीडीमुळेच झाले, एवढे मोठे ते प्रकरण आहे.
यात अनेक ऑफिसर, अनेक आयएएस व माजी अधिकारी आहेत. अनेक मोठी माणसे आहेत. त्यावर अधिक काही बोलण्याची गरज नाही. ते ज्यावेळी आम्ही दाखवू त्यावेळी आम्हाला 10-20 हजारांचे तिकीटच लावावे लागेल. ते चित्र निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच दाखवावे लागेल. एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.

