पुणे-मागील ७ तारीख ते १२ जुलै दरम्यानच्या पाच दिवसांत पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 15 चितळ प्रकारातील हरणांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्राणी संग्रहालय प्रशासन आणि पुणे महानगरपालिकाही चक्रावून गेली आहे.प्राथमिक माहितीनुसार, यामागे एखाद्या साथीच्या आजाराची शक्यता वर्तवली जात असली तरी, अद्याप मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. प्राणीसंग्रहालयात एकूण 99 चितळ प्रकारातील हरणे होती, त्यापैकी 15 हरणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मृत हरणांचे शवविच्छेदन (पोस्ट मार्टेम) क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या पशु रोग तज्ञांनी केले आहे. तसेच, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत हरणांचे जैविक नमुने विभागीय वन्यजीव प्रशिक्षण केंद्र नागपूर, बरेली, भोपाळ आणि ओरिसा येथील भुवनेश्वर येथील नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालांनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे.

प्राणीसंग्रहालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम पवार म्हणाले ,’ चार ते पाच दिवसात आमच्याकडील एकूण 15 हरणांचा अचानक मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे या घटनांच्या मृत्यूबाबत विविध पातळ्यांवर तपासणी केली जात आहे, शहरातील आणि शहराबाहेरील काही महत्त्वाच्या नामांकित प्रयोगशाळांना जैविक नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल तीन चार दिवसात आम्हाला प्राप्त होईल हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेमाचे नेमके कारण स्पष्ट होईल.
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव म्हणाले,’ गेले पाच ते सहा दिवसांत आमच्याकडील 16 चितळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत हरणांचे जैविक नमुने तपासणीसाठी चार महत्त्वाच्या प्रयोगशाळांना पाठवले आहेत. या हरणांच्या मृत्यूमागचे नेमके कारण प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच समोर येईल. मात्र, या हरणांच्या मृत्यूमागे साथीचा आजार आहे का, हे देखील आमच्याकडून तपासले जात आहे.

