- संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, पंढरपुरात जनजागृती राबविले अभियान
पुणे/पंढरपूर: आषाढी वारीनिमित्त दरवर्षी लाखो वारकरी भाविक भक्त संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पायी वारीमध्ये सहभागी होत असतात. याच पायी वारीत मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने पहिल्यांदाच प्रचार व प्रसिद्धी अभियान वारी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. पालखी मुक्कामी मनोरंजन व प्रबोधनात्मक पद्धतीने जनजागृती करण्यात आली. वारकरी व भाविक भक्तांनी या मदत व पुनर्वसन विभागाच्या वारीला भरभरुन प्रतिसाद दिला.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या संकल्पनेतून विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीकरीता हे अभियान राबविण्यात आले. दोन्ही पालखी मार्गावर, तसेच पंढरपूर यात्रेदरम्यान हे अभियान झाले. या अभियान वारीत विविध लोककलांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये किर्तन, पारंपारिक वासुदेव, भारुड, पथनाट्य, चित्ररथ व एलईडी व्हॅन्स याव्दारे विभागाने राबविलेले निर्णय आणि योजनांची प्रसिद्धी करण्यात आली. मंत्री मकरंद आबा पाटील व सहसचिव संजय इंगळे यांच्या हस्ते लोणंद येथे या अभियानाची सुरुवात झाली.
दोन्ही पालखी मार्गांवर १०० हून अधिक कलाकारांनी या अभियानात सहभाग घेत जनजागृती केली. या कलाकारांनी मदत व पुनर्वसन विभागाचे निर्णय व काम वारीमध्ये प्रभावी मांडले. तसेच पालखी विसावा व पालखी तळ आणि पंढरपुर शहराच्या विविध प्रवेशद्वारांवर योजनांची माहिती देणारे क्लेक्स लावण्यात आले होते. सेल्फी पॅांईंट व माहितीपत्रकांच्या माध्यमातून वारीत सहभागी झालेल्या शेतकरी बांधव व नागरिकांपर्यंत विभागाची माहिती पोहचविण्यात आली. विभागाच्या योजना व निर्णय यावर आधारित माहितीपट, छोट्या फिल्म्स व जिंगल्स यांचेही एलईडी व्हॅन्सच्या माध्यमातून वारीत प्रसारण करण्यात आले.
यामध्ये सोशल मिडियाचाही प्रभावी वापर करण्यात आला. सोशल मिडियावर लाखो लोकांनी व्हिडिओज पाहिले. लोणंद येथे उभारण्यात आलेले स्वागतपर भव्य व आकर्षक कटआऊट सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. ईसबावी येथे विभागाने वारकऱ्यांच्या स्वागतासाठी व्यासपीठ उभारले होते. विभागाच्या वतीने वारकरी बांधवांना दोन दिवस हजारो पाणी बॅाटल्सचे मोफत वाटप करण्यात आले. लोणंद येथे मोफत जेवण व पाणी देण्यात आले. पंढरपुरमध्ये एसटी स्टँन्ड, रेल्वे स्टेशन, चंद्रभागा वाळवंट, गोपाळपूर व ६५ एकर आदी परिसरात सुरु ठेवण्यात आले होते.

