मुंबई: मिरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने आज मध्यरात्रीपासून शहरात प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांच्या या कारवाईवर मराठी भाषिक संताप व्यक्त करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पोलिसांची ठामपणे पाठराखण केली. आम्हाला अमूक एका मार्गावरून मोर्चा काढायचा आहे, अशी भूमिका घेऊन कायदा-सुव्यवस्था बिघडवणं योग्य नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मोर्चाच्या आयोजकांना फटकारलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका घेतली असतानाच सरकारमधीलच एक मंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी मोर्चेकरांची बाजू घेत पोलिसांवर गंभीर आरोप केले असून मी या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असल्याचं जाहीर केलं आहे.
“आज सकाळपासून पोलिसांनी मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी माणसाची गुंडगिरीच्या मार्गाने जी धरपकड सुरू केली आहे त्याचा मी निषेध करतो. मुख्यमंत्र्यांकडे मी हा निषेध व्यक्त केला आहे. आता मी स्वत: या मोर्चात सहभागी होण्यासाठी मिरा भाईंदरकडे निघालो आहे. पोलिसांची हिंमत असेल तर मला अटक करून दाखवावी,” असं खुलं आव्हान प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना दिलं आहे. एकीकडे मोर्चावरून मुख्यमंत्री पोलिसांची पाठराखण करत असतानाच त्यांच्याच मंत्रिमंडळातील सरनाईक मात्र पोलिसांवर आगपाखड करत असल्याने सरकारमध्ये या मुद्द्यावरून मतभेद असल्याचं उघड झालं आहे.

