मुंबई-महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे यासह भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कारही त्यांच्यावर आहेत.यावेळी आशिष शेलार म्हणाले, रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. रवींद्र चव्हाण हे भाजपचे नावाने बारावे अध्यक्ष असतील. मात्र ते विरोधकांचे राजकीय तेरावे घालतील, विरोधकांचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही.मुंबई महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद अशा विविध स्तरांवरील निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांत जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणून भाजपला यश मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आता चव्हाण यांच्यावर असणार आहे.
रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 2009 पासून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अलीकडच्या निवडणुकीत तब्बल 50 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयी झाले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.
रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपने 2002 साली कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. 2005 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते. 2007 मध्ये ते स्थायी समितीचे सभापती झाले. 2009 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवले आणि मोठा विजय देखील मिळवला. त्यानंतर 2016 साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची हॅटट्रीक पूर्ण केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑगस्ट 2022 मध्ये महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार हाती घेतला. ओबीसी चेहरा असणाऱ्या बावनकुळेंच्या नेतृत्वात पक्षाने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले. बावनकुळे यांनी भाजपची स्थानिक पातळीवरील रचना मजबूत केली. 1.5 कोटी नवीन प्राथमिक सदस्य व 5 लाख सक्रिय कार्यकर्ते जोडण्यात यश मिळवले. बूथ स्तरापासून ते जिल्हा पातळीपर्यंत संघटनात्मक निवडणुका आणि नियुक्त्यांचे नियोजन केले. यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या असल्या तरी, बावनकुळेंनी त्यातून धडा घेऊन विधानसभा निवडणुकीत बूथस्तरीय व्यवस्थापन करून भाजपला यश मिळवून दिले.

