पुणे : शहराच्या विकासाची बकवास करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांच्याच पक्षाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी घरचा आहेर दिला आहे, अशी टीका माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
गेल्या दहा वर्षात पुण्याचा विकास शून्य झाल्याची कबुली खासदार कुलकर्णी यांनी दिली असून पुण्यात रहावेसे वाटत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. विकास खुंटल्याने पुणे नकोसे झाले असे सांगून त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. भाजपच्या दिशाहीन आणि निष्क्रिय कारभारावर विरोधी पक्षांनी टीका करायची गरज उरलेली नाही, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाजावाजा केलेली स्मार्ट सिटी योजना पुण्यासह देशभर फसली आहे. मुठा नदी सुधार नदी योजनेची वीट सुद्धा हललेली नाही, असे भाजपचे नेते बोलत असतात. रस्ते, स्वच्छता आदी नागरी सुविधा कोलमडलेल्या आहेत. रस्ते चांगले नसल्याने छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यात तरुणांचा बळी गेल्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. त्याचे गांभीर्य भाजप नेत्यांच्या वागणुकीत दिसत नाही. पीएमपीएमएलच्या बसगाड्यांच्या ताफ्यात नव्याने भर घालणेही भाजपच्या नेत्यांना गेल्या पाच वर्षांत जमलेले नाही. पीएमपीएमएलच्या प्रवाशांना दररोज मनःस्ताप सहन करावा लागतो. फक्त निवडणुका जिंकण्यासाठी डावपेच,उथळ कार्यक्रम यात भाजपचे खासदार आमदार मश्गूल आहेत. पुणेकरांनी भाजपला भरभरून मते दिली पण नेते मस्तीत राहिले, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
पुण्याच्या या अवस्थेला प्रशासन जबाबदार नसून त्यावर नियंत्रण ठेवणारे भाजपचे मंत्री, खासदार, आमदार जबाबदार आहेत. मेट्रो, अंतर्गत वर्तुळाकार मार्ग, शहराभोवतीचा रिंग रोड यात मोठ्या घोषणा मुख्य मंत्र्यांनी केल्या अंमलबजावणी काही नाही. मेट्रोचे काम गतीने होत नाही, याकडेही मोहन जोशी यांनी लक्ष वेधले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पुणेकर भाजपला धडा शिकवल्या शिवाय रहाणार नाहीत.

