पुणे: पुणे येथील वनभवन येथे नुकतीच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे व यांच्यात बैठक (ता. २७) पार पडली. बैठकीत वडगावशेरी परिसरात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक वनजमिनीबाबत चर्चा झाली. आमदार पठारे यांनी याबाबत अनेक मुद्दे वनमंत्र्यासमोर मांडले. या सर्व मुद्द्यांना मंत्री नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
बैठकीत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोहगाव येथील डी. वाय. पाटील महाविद्यलयाच्या डोंगरावर असलेल्या स. नं. ३०४ मधील वनजमिनीच्या भागात पुणे महानगरपालिकेमार्फत १ एमबीआर, १ संप वेल व २ नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचा प्रस्ताव आहे. एकूण ०.९७५९ हेक्टर इतकी जागा आवश्यक असून यासाठी अनेक महिने प्रक्रिया सुरू आहे. महानगरपालिकेने मूळ प्रस्ताव, फेर प्रस्ताव, सुधारित प्रस्ताव, संयुक्त पाहण्या, अहवाल आदी सर्व पूर्तता केली असूनदेखील अद्याप जमीन ताब्यात मिळालेली नाही. या कारणामुळे लोहगाव परिसरातील जलप्रकल्प रखडला असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हे सर्व तपशील पठारे यांनी बैठकीत मांडले.
मंत्री नाईक यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना ही जागा महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे लोहगाव परिसरात ५०% भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची शक्यता बापूसाहेब पठारे यांनी वर्तवली.
या व्यतिरिक्त बापूसाहेब पठारे यांनी इतर काही महत्त्वाचे प्रस्तावही मांडले. त्यांनाही वनमंत्र्यांनी सहमती दिली असल्याचे समजते. त्यामध्ये, मौजे निरगुडी व वडगाव शिंदे येथील वनविभागाच्या जमिनीवर उच्च दर्जाचे वनउद्यान विकसित करणे, लोहगाव ते निरगुडी मार्ग वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने त्यावर अडथळे येत आहेत. हा मार्ग चऱ्होली व निरगुडीच्या पश्चिम सीमेवरून स्थलांतरित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावरही सकारात्मक निर्णय घेण्यात आला. तसेच, खराडी ते शिवणे रस्त्यावर स. नं. ५७ मधील ०.३८४ हेक्टर वनजमिनीचा वापर रस्ता विकसित करण्यासाठी करावा, अशी मागणीही करण्यात आली. यावरही मंत्री नाईक यांनी सहमती दर्शवली.
सदरच्या सर्वच निर्णयांमुळे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या पाणी, रस्ते, वाहतूक व पर्यावरणविषयक अनेक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. बैठकीनंतर आमदार बापूसाहेब पठारे तसेच आमदार महेश लांडगे यांनी मंत्री गणेश नाईक यांचे धानोरी ते चऱ्होली या गावांना जोडणाऱ्या रस्त्याकरिता आवश्यक असलेली वन विभागाची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करत आभार मानले.

