विमान आणि पायलट दोन्ही उत्कृष्टच होते..आम्ही तपास अहवालाच्या प्रतीक्षेत तोवर कृपया अंदाज लावू नका
टाटा समूहाच्या अध्यक्षांची एआय१७१ दुर्घटनेवरील प्रतिक्रिया, विमानांच्या संपूर्ण ताफ्यामध्ये अंमलात आणल्या जाणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांची दिली माहिती
एअर इंडियाचे विमान एआय१७१ला, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या, २७५ जीव ज्यामध्ये गमावले गेले त्या दुर्घटनेनंतर दिलेल्या पहिल्या तपशीलवार सार्वजनिक प्रतिक्रियेमध्ये, टाटा सन्सचे अध्यक्ष श्री एन चंद्रशेखरन यांनी ग्वाही दिली की, टाटा समूह या दुर्घटनेमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी राहील. एअर इंडियाच्या संपूर्ण विमान ताफ्यामध्ये अंमलात आणल्या जाणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
एका टीव्ही मुलाखतीमध्ये श्री चंद्रशेखरन यांनी सांगितले की, हा अपघात ज्या विमानाला झाला त्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाचा मेंटेनन्स रेकॉर्ड खूप चांगला होता आणि एअर इंडियाच्या सर्वात अनुभवी पायलट्सकडे ते सोपवण्यात आले होते.
श्री चंद्रशेखरन म्हणाले, “या विमानाचा इतिहास अतिशय साफ होता.” त्याची याआधीची मोठी तपासणी जून २०२३ मध्ये करण्यात आली होती आणि पुढील तपासणी डिसेंबर २०२५ मध्ये करण्याचे ठरवण्यात आले होते. मार्च २०२५ मध्ये त्याच्या उजव्या इंजिनची दुरुस्ती करण्यात आली, तर एप्रिल २०२५ मध्ये डाव्या इंजिनची तपासणी करण्यात आली होती.” त्यांनी जोर देऊन सांगितले की, “विमान आणि इंजिन दोन्हीचे नियमितपणे निरीक्षण केले जात होते, उड्डाणापूर्वी कोणतीही समस्या दिसून आली नाही.”
एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी ग्राहकांना उद्देशून केलेल्या एका संबोधनात विमानात तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांविषयी अतिरिक्त तपशील पुरवले. विमानातील कर्मचारी अतिशय अनुभवी होते हे सांगताना त्यांनी नमूद केले आहे की, “विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमीत सभरवाल करत होते. ते अतिशय अनुभवी पायलट होते आणि विविध विमाने चालवण्याचा १०,००० पेक्षा जास्त तासांचा अनुभव त्यांच्याकडे होता. फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे ३४०० पेक्षा जास्त तासांचा विमान चालवण्याचा अनुभव होता.”
श्री चंद्रशेखरन म्हणाले, “डीजीसीएने खात्री केली आहे की, आमच्या बोईंग ७८७ ताफ्यामध्ये आणि मेंटेनन्स प्रक्रियांमध्ये सुरक्षा मानकांचे पुरेपूर पालन केले जाते.” तथापि, विल्सन यांनी उल्लेख केल्यानुसार “विश्वास वाढवणारा उपाय” म्हणून, एअर इंडियाने त्यांच्या बोईंग ७८७ आणि बोईंग ७७७ या दोन्ही ताफ्यांवर उड्डाणपूर्व सुरक्षा तपासणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नियामक आवश्यकतांच्या पलीकडे जाऊन अतिरिक्त उपाययोजना करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना, विल्सन यांनी जोर दिला की, “एअर इंडियामध्ये तुमची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असते आणि २०२२ मध्ये आम्ही ही एअरलाईन चालवायला घेतल्यापासून आम्ही या गोष्टीचे काटेकोरपणे पालन करत आलो आहोत.”
दुर्घटनास्थळी दोन्ही ब्लॅक बॉक्सेस सापडले आहेत. भारताचे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो, यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, बोईंग, जीई एरोस्पेस आणि युकेच्या एअर ऍक्सिडेंट्स इन्वेस्टिगेशन ब्रांचच्या तज्ञांची एक बहुराष्ट्रीय तपासणी टीम सध्या सर्व माहितीचे विश्लेषण करत आहे.
श्री चंद्रशेखरन म्हणाले, “आम्ही आणि संपूर्ण एव्हिएशन उद्योग अधिकृत तपासणी अहवालाची वाट पाहत आहोत, जेणेकरून आम्हाला ही संपूर्ण दुर्घटना अधिक समजून घेता येईल.” अधिकृत अहवाल येण्याच्या आधी दुर्घटनेच्या कारणांबाबत कोणतेही अंदाज लावू नयेत असेही त्यांनी सांगितले.
टाटा समूहाने या दुर्घटनेवर अतिशय तातडीने, सर्वसमावेशक प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये बळी पडलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला १ कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जखमी झालेल्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च टाटा समूह उचलणार आहे. तसेच मेडिकल हॉस्टेलचे जे नुकसान झाले आहे ते पुन्हा बांधून देण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्याचे देखील त्यांनी वचन दिले आहे. दुर्घटनेच्या पीडित कुटुंबांना दीर्घकालीन साहाय्य पुरवण्यासाठी ‘एआय१७१ ट्रस्ट’ स्थापन करण्याची देखील योजना आहे.
श्री चंद्रशेखरन यांनी ही संपूर्ण घटना आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती “हृदय पिळवटून टाकणारी” असल्याचे सांगितले, ही दुर्घटना टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाईनच्या बाबतीत घडली याचे मला स्वतःला खूप जास्त दुःख झाले आहे असेही ते म्हणाले. त्यांनी ग्वाही दिली की, “आम्ही एवढेच वचन देऊ शकतो की, आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि पुढे देखील राहू, मी स्वतः कायम त्यांच्यासोबत राहीन.”
विल्सन यांनी देखील याच भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “प्रभावित झालेल्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते सर्व करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या दुर्दैवी घटनेचे कारण समजून घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत.”
हा आणीबाणीचा प्रसंग टाटा समूह ज्या प्रकारे हाताळत आहे त्याला उद्योग-व्यवसायातील दिग्गज आणि प्रसिद्धीमाध्यमांकडून खूप नावाजले जात आहे.
आरपीजी एंटरप्रायजेसचे अध्यक्ष श्री हर्ष गोएंका यांनी इकॉनॉमिक टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात नमूद केले होते की, “अशा प्रसंगी, नेतृत्वाची भूमिका ही फक्त धोरणांपुरती किंवा गुंतवणूकदारांना खुश करण्यापुरती नसते तर, नेतृत्वाने त्यामध्ये जातीने लक्ष घालणे, कर्मचाऱ्यांना धीर देणे, कुटुंबांचे सांत्वन करणे, आपण अपयशी ठरलो हे मान्य करणे, नम्रतेने ऐकणे आणि स्पष्टपणे वागणे महत्त्वाचे असते.”
२०२२ साली जेव्हा सरकारकडून एअर इंडियाचे पुनःसंपादन करण्यात आले तेव्हा त्याचे नेतृत्व श्री चंद्रशेखरन यांनी केले होते. मुलाखतीदरम्यान त्यांनी टाटा समूहाच्या गौरवशाली वारशाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “मी स्वतः टाटा समूहाच्या मार्गदर्शनाखाली इथवर आलो आहे आणि टाटा समूहाच्या मूल्यांसह वाढलो आहे. मी जेआरडी नाही, मी आरएनटी नाही (रतन नवल टाटा) नाही. पण आपण सर्व या मूल्यांनी प्रेरित आहोत आणि आशा करतो की आपण चारित्र्य चांगले ठेवू आणि दृढनिश्चयाने वागू जेणेकरून सर्वांना आपला अभिमान वाटेल.”
एआय१७१ दुर्घटना आणि त्यानंतरच्या घटना टाटा समूहामध्ये आल्यावर एअर इंडियामध्ये जे परिवर्तन सुरु आहे त्यासाठी एक खूप मोठे आव्हान आहेत. संचालनातील व्यत्यय आणि संपूर्ण विमान ताफ्याचे सुरक्षा पुनरावलोकन अशा वेळी आले आहे जेव्हा ही एअरलाइन प्रीमियम जागतिक कॅरियर म्हणून आपले स्थान पुन्हा मिळवण्याच्या उद्देशाने आक्रमक आधुनिकीकरण आणि विस्तार धोरण राबवत आहे. संचालनावर अल्पकालीन परिणामांसह, सुधारित सुरक्षा उपायांप्रती टाटा समूहाची वचनबद्धता व्यावसायिक विचारांपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची समूहाची भूमिका अधोरेखित करते.

