पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून पावसाची हजेरी सुरूच असून पावसाची रिपरिप सुरू आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागाबरोबरच, खडकवासला धरण क्षेत्र परिसर, सिंहगड रोड, धायरी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव या उपनगरात पाणी साचल्याचे आढळून आले आहे.आज दुपारी प्रथम ठीक दुपारी . 1.00 वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 1920 क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात आला त्यानंतर सुरू असणारा 1920 क्युसेक्स विसर्ग वाढवून संध्याकाळी 06:00 वा. 4345 क्यूसेक्स करण्यात आला आहे आणि अजून तासाभराने म्हणजे संध्याकाळी 07:00 वा. 8734क्यूसेक्स करण्यात आला आणि आता रात्री साडेनऊ वाजता 15 हजार क्युसेक चा विसर्ग सुरू करण्यात आला.
काही भागात घरात पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत.पुणे महापालिकेने खडकवासला धरणातून दुपारी १ वाजता सुमारे २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावे. अनावश्यक प्रवास व नदीकाठी फिरणे टाळावे. कृपया नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात आकाश ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या रिपरिपीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने प्रमुख मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.सध्या भिडे पुलावरून वाहतूक बंद असल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचे दिसून येत आहे.खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या परिरसरातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे दरवर्षी धरणं ही जुलै महिन्यानंतर किंवा ऑगस्ट महिन्यांत भरत असली तरी यंदा पावसाचे लवकर आगमन झाले आहे. त्यामुळे धरणं लवकरच भरतील अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मिटेल, असा अंदाज आहे.

