
पुणे -जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी वारीसाठी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले. देहू गावापासून निघालेल्या या पालखीत विठ्ठल-रखुमाईच्या भेटीची ओढ असणाऱ्या हजारो वारकऱ्यांचा समावेश आहे.
संत तुकाराम महाराज यांचा यंदाचा हा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संत तुकारामांच्या पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर तुकोबांची पालखीचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनील शेळके, आमदार विजय शिवतारे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे,आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प.विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी, येथील मुख्य मंदिराजवळील शिळा मंदिराच्या समोर वारकऱ्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी टाळ- मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा-तुकोबांचे नामस्मरण केले जात होते. श्री संत तुकाराम महाराज संस्थानने यंदाच्या सोहळ्यासाठी 3 बैलजोड्या खरेदी केल्या आहेत.
पालखीचा आजचा मुक्काम इनामदार वाड्यात–प्रमुख दिंड्याच्या उपस्थित व वारकरी भाविक भक्तांसह हरिनामाच्या गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात, गरुड, टक्के यांच्या समवेत सायंकाळी 5 वाजता पालखी मंदिर प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिरातून प्रस्थान होईल. सायंकाळी 6.30 वाजता पालखी प्रस्थान सोहळा श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदारसाहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसावणार आहे. त्या ठिकाणी आरती होऊन रात्री देहूकर महाराजांचे कीर्तन, हरिनामाचा जागर असे धार्मिक कार्यक्रम होतील.
मुख्यमंत्र्याच्या हस्ते पादुका पूजन होत असताना पोलिसांनी वारकऱ्यांच्या दिंड्या काहीवेळ रोखून धरल्या होत्या. यामुळे वारकरी चांगलेच संतप्त झाले. त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या घटनेची पुष्टी करत दिंड्या थांबवण्याचे कारण सांगितले. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी ज्या प्रकारे सुव्यवस्था ठेवली पाहिजे, त्याच प्रकारे ठेवली आहे. एकावेळी सर्वांना सोडले तर चेंगराचेंगरी होण्याची शक्यता होती. त्यामुळे वारकऱ्यांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. वारकरी हा शिस्तप्रिय आहे. त्यामुळे तो अर्धा तास थांबावे लागले काय किंवा तासभर थांबले काय अशा गोष्टींची चिंता करत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी काही वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याचेही दिसून आले.
मुख्यमंत्र्यांजवळ पडला ड्रोन–आजपासून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. त्यावेळी पालखी सोहळ्याचे छायाचित्रण करणारा एक ड्रोन मुख्य प्रवेशद्वाराजवळ पडला. हा ड्रोन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापासून अवघ्या 5-10 फुटांवर पडला. सुदैवाने त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी हा ड्रोन जप्त केला.
तुकोबांच्या पालखीचा मार्ग
- 18 जून- देहूतून प्रस्थान
- 19 जून- आकुर्डी
- 20 जून- नाना पेठ, पुणे
- 21 जून- निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे
- 22 जून- लोनी काळभोर
- 23 जून- यवत
- 24 जून- वरवंड
- 25 जून- उंडवडी गवळ्याची
- 26 जून- बारामती
- 27 जून- सणसर
- 28 जून- निमगाव केतकी
- 29 जून- इंदापूर
- 30 जून- सराटी
- 1 जुलै- अकलूज
- 2 जुलै बोरगाव श्रीपूर
- 3 जुलै- पिराची करौली
- 4 जुलै- वाखरी
- 5 जुलै- पंढरपूर
पालखीच्या मार्गात कुठे काय
- बेलवडी येथे पहिले गोल रिंगण
- काटेवाडी येथे मेंढ्यांचे रिंगण
- इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण
- सराटी येथे पादुकांना नीरास्नान
- अकलूज येथे तिसरे गोल रिंगण
- माळीनगर येथे पहिले उभे रिंगण
- तोंडले बोंडले येथे धावा
- बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण
- वाखरी येथे पादुका आरती आणि तिसरे उभे रिंगण
- यंदा पालखी रथाच्या पुढे 27 व मागे 370 दिंड्या सहभागी होणार

