स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी सावरकर उपक्रम अंतर्गत विनामूल्य व्रतबंध सोहळा

पुणे : गणेश पूजन…पारंपरिक पद्धतीने केलेले चौलकर्म…मातृभोजन… व्रतबंधन असे शास्त्रोक्त पद्धतीने विधी करत समाजातील वेगवेगळ्या घटकातील आणि अनाथ – विशेष मुलांची मुंज विधिवत पार पडली. व्रतबंध या पवित्र संस्कारामुळे मूळ संस्कृतीशी मुलांची नाळ जोडत ५८ मुले आणि मुली यांचा एकत्रित व्रतबंध सोहळा पार पडला. सामाजिक एकतेचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार या माध्यमातून समाजापर्यंत पोचविण्यात आला.
स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी सावरकर उपक्रम अंतर्गत हिंदूंच्या १८ विविध समाजातील ५८ मुलामुलींच्या सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन कर्वे रस्त्यावरील अश्वमेध मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर उपस्थित होते.
संस्काराचे समाजव्यापी महत्त्व ओळखून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत आपल्या कार्यकाळात सर्व हिंदू समाजासाठी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याची संकल्पना मांडली होती. सावरकरांनी मालवणला तथाकथित १५० अस्पृश्यांच्या मुंजी लावल्या होत्या आणि त्यांना स्वतः जानवं घातली होती. त्यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट मागील चार वर्षे हा उपक्रम सातत्याने राबवत आहे.
बदलत्या काळात शिक्षण आणि जीवनशैलीत अनेक बदल झाले असले, तरी भारतीय हिंदू संस्कृतीतील मूलभूत संस्कारांची गरज अजूनही तितकीच महत्त्वाची आहे. त्यापैकीच एक म्हणजे व्रतबंध संस्कार, ज्ञानार्जनाच्या प्रवासाची सुरुवात करणारा एक पवित्र टप्पा आहे.

