पाणी काढण्यासाठी पंपाची व्यवस्था
मुंबई- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत दरवर्षी प्रमाणेच सर्वत्र पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याचा फटका लोकल वाहतुकीला तसेच रस्त्यावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. बीएमसीच्या आपत्ती कक्षातून एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पावसानेच थोडे लवकर आगमन केल्याने धावपळ झाली, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही कंट्रोल रूममधून सगळे स्पॉट बघितले आहेत. म्हणजे जिथे पाणी तुंबले होते जसे हिंदमाता आहे, सबवे असेल, सायन आहे, अंधेरी आहे. आता तुम्ही बघा तिथे पाणी नसेल कारण तिथे पंपाची व्यवस्था केलेली आहे. आपण एक अंदाज बांधत असतो की जूनच्या 10 तारखेपर्यंत पाऊस येईल आणि तशी तयारी आपण करतो. पण पाऊसच अगोदर आला. आता माझ्याकडे आकडेवारी आलेली आहे, नरीमन पॉइंटला 252 मिमी पाऊस पडला, महापालिका मुख्याल येथे 216 मिमी पाऊस पडला, कुलाबा येथे 207 मिमी पाऊस पडला. म्हणजे जिथे आपण अपेक्षित धरतो 50-55. पण इथे एवढा पाऊस पडला म्हणजे हे एकप्रकारे ढगफूटीच झाली आहे.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आपली जी यंत्रणा आहे बीएमसीची ती आता कामाला लागली आहे. जिथे जिथे पाणी साचले जोते तिथले पाणी काढण्यात आले आहे. तसेच आता वाहतूक देखील सुरळीत सुरू झाली आहे. लोकल देखील धीम्या गतीने सुरू झाली आहे. आता मला वाटते की या ठिकाणी नालेसफाई देखील सुरू आहे आणि एकंदरीत पावसानेच थोडे लवकर आगमन केल्याने धावपळ झाली आहे. याच्यातून नागरिकांना कमीतकमी त्रास व्हावा यासाठी बैठक देखील घेतली होती आपत्ती व्यवस्थापनाची. त्यात रेल्वे, महापालिका, एनडीआरएफ, ही सगळी यंत्रणा अलर्ट आहे आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल असा प्रयत्न केला जाईल.
आपले आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील माहिती घेतली आहे. मी देखील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क करत आहे. मुख्यमंत्री देखील लक्ष देऊन आहेत. अजितदादा देखील पुण्यात आहेत. यंत्रणा सर्वत्र अलर्ट आहे. शासन आणि प्रशासन एक टीम म्हणून आम्ही काम करत आहोत. लँड स्लाइडच्या बाबतीत विखरोळीच्या भागात ज्या टेकड्या आहेत तिथे देखील रॉक बिल्डिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते आता पाण्याचा निचरा झाला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, आता कुठलाही पंप बंद पडणार नाही. पूर्ण क्षमतेने पंप सुरू असून पाण्याचा निचरा होत आहे. हिंदमाता येथील पाणी देखील आता गेले आहे. सकल भागात जे काही पाणी साचले होते त्याचा निचरा झाला आहे. नालेसफाईमध्ये देखील एआयचा वापर करण्यात आला आहे. जिथे कुठे पाणी असेल लोकांनी तत्काळ संबंधित विभागाला कळवावे ज्यामुळे त्याची तातडीने दखल घेतली जाईल.

