आमच्यावर अन्याय होतोय ही खरी गोष्ट आहे. मला एकट्याला मंत्रिपद मिळाले असले तरी माझ्या कार्यकर्त्यांना देखील सत्तेचा सहभाग मिळायला हवा. शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडी बरोबर असताना आमचे 6 ते 7 जण विधान परिषदेवर होते, 3 ते 4 मंत्री देखील झाले होते. त्यामध्ये मी मंत्री झालो, शेगावकर मंत्री झाले होते, दयानंद म्हस्के मंत्री झाले होते, मुंबईत आमचा महापौर झाला होता. पुण्यात देखील आमचा उपमहापौर झाला होता. त्या काळात आम्हाला अनेक ठिकाणी सत्ता मिळाली. मात्र, आता महायुतीच्या काळात आरपीआयला सत्ता मिळत नाही अशी परिस्थिती असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
मुंबई-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. महायुती सरकारमध्ये आरपीआयला एकही मंत्रिपद न मिळाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळातील अनुभवाची आठवण करून दिली. आता महायुतीच्या काळात आमच्या पक्षाला सत्ता मिळत नाही. मात्र, शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडीबरोबर असताना आमच्या पक्षाला सत्ता मिळायची. आता महायुतीमध्ये आम्ही असूनही आमच्यावर अन्याय होत आहे, असे रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
रामदास आठवले यांनी याआधीही महायुतीकडून होणाऱ्या वागणुकीवर नाराजी दर्शवली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयने दोन जागांची मागणी केली होती, मात्र त्यांना एकही जागा मिळाली नाही. त्याचप्रमाणे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि विधानपरिषदेत देखील आरपीआयला एकही जागा मिळाली नव्हती. तेव्हा देखील आठवले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती.
आज आमची अडचण अशी आहे की आता मला एक मंत्रिपद मिळालेले आहे. पण माझ्या पक्षाचा एकही खासदार किंवा आमदार नाही. तरीही माझ्या पक्षाची जी काही छोटी-मोठी ताकद आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे. त्यामुळे मला तीन वेळा त्यांनी मंत्रिमंडळात घेतले. मात्र, आमच्या पक्षातील बाकीच्या लोकांना काही मिळत नाही. दिल्लीतही काही पद मिळत नाही आणि महाराष्ट्रात नाही, अशी खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला एकही जागा दिली नाही : ते म्हणाले, आम्हाला एखादे महामंडळ किंवा मंत्रिपद मिळायला हवे होते. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अनेकदा चर्चा झाली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षासाठी अनेकदा विधान परिषदेसाठी नावे जाहीर केली. पण आमच्या पक्षाला विधानसभेला एकही जागा दिली नाही, किमान विधान परिषदेची तरी एक जागा द्यायला हवी होती, तसेच आमच्या पक्षाचा एक मंत्री देखील करायला हवा होता, अशी खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली.

