पुणे : सध्याच्या मोबाइल आणि एआयचा काळात मातीशी नाळ तुटणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मुलांना पुस्तकांकडे, वाचनाकडे वळवणे महत्त्वाचे आहे. त्या दृृष्टीने बालपुस्तक जत्रा पुण्यापुरती राहू नये. बालपुस्तक जत्रेचे प्रारुप विभाग, जिल्हा, तालुका पातळीवर नेण्यासाठी शिक्षण विभाग पुढाकार घेईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केली.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे बालपुस्तक जत्रा कार्यक्रमात भुसे बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक श्री राजेश पांडे, बालभारतीचे संचालक श्री. कृष्णकुमार पाटील, किशोर मासिकाचे संपादक श्री.किरण केंद्रे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री सागर वैद्य, श्री.प्रसेनजित फडणवीस, संवाद पुणेचे श्री.सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात किशोर मासिकाच्या अंकासह साने गुरुजी, श्यामची आई या इंग्रजीत अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन भुसे यांच्या हस्ते झाले.
श्री दादाजी भुसे म्हणाले, पुणे बालपुस्तक जत्रा हा नवीन प्रयोग निर्माण झाला. त्यातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिकायला मिळाले आहे. हे प्रारुप राज्य, जिल्हा पातळीवर नेण्याचा शिक्षण विभाग प्रयत्न करेल. संयुक्त पद्धतीने राज्यभर आयोजन करण्यात येईल. शिक्षण विभाग राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. हसतखेळत शिक्षण, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आताच्या काळात आर्थिक परिस्थिती असलेले पालक मुलांना इंग्रजी, इतर माध्यमांत शिकवतात. दुसरीकडे जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गोरगरीबांची मुले जातात. त्यातून एकप्रकारची दरी निर्माण होत असल्याचे दिसते. मात्र, गोरगरीब मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर व्यापक पातळीवर शिकवला गेला पाहिजे ही मागणी त्यांनी लगेचच मान्य करून तत्काळ अंमलबजावणीचे निर्देशही दिले. तसेच अभिजात दर्जा मिळालेली मराठी इतर माध्यमांत सक्तीची केली पाहिजे अशी मागणी केली. त्यानुसार सीबीएसईने महाराष्ट्रात मराठी शिकवण्याचे निर्देश दिले आहेत. आणखीही काही विषयांत केंद्राचे सहकार्य मिळणार आहे. राज्यात पहिली ते बारावीचे दोन कोटी बारा लाख विद्यार्थी, सात लाख शिक्षक, अनेक संस्था आहेत. शिक्षण हे फार मोठे क्षेत्र आहे. जितके चांगले काम करता येईल त्यासाठी प्रयत्न आहे. येत्या वर्षभरात सकारात्मक बदल दिसतील, असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला.
पुणे बालपुस्तक जत्रेला
२५ हजारांहून अधिक मुलांनी भेट
बालपुस्तक जत्रा हा प्रयोग पहिल्यांदा केला आहे. अशी जत्रा महाराष्ट्रात, देशात कुठेही होत नाही. खेळ, पुस्तके, खाऊ हे सगळे येथे मुलांना एका ठिकाणी उपलब्ध झाले आहे. पुणेकरांनी आणि मुलांनी या जत्रेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. तीन दिवसांत २५ हजारांहून अधिक मुलांनी जत्रेला भेट दिली. त्यामुळे येत्या काळात मुलांच्या भावविश्वाला ही जत्रा आकार देईल असा विश्वास आहे, असे श्री.राजेश पांडे यांनी सांगितले.

