पुणे- शहरातील मातब्बर म्हणून गणल्या जाणाऱ्या आणि नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात कायम राहून,आपल्यावरआपले राजकीय अस्तित्व संपविण्याच्या दृष्टीने होणारे हल्ल्यावर हल्ले पचवून पुन्हा पुन्हा उभारी घेत पुढे येत असलेल्या पुण्याच्या दीपक मानकर यांनी आपला राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो असलेले नेते अजित पवार यांच्याकडे सोपविला आहे. पोलिसांच्या मदतीने मानकर यांची राजकीय कारकीर्द संपविण्याचे कायम प्रयत्न झाले. पण गेली ४ दशके त्यांची राजकीय कारकीर्द संपविण्यात कोणालाही यश आले नाही.कॉंग्रेस मध्ये असताना सुरेश कलमाडी यांनी त्यांना डावलून त्यांच्या नेतुत्वाला खच्ची करण्याचे प्रयत्न केले.त्यानंतर ते कॉंग्रेस मधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादीत आले . त्यानंतर भाजपचे राज्यात सरकार असताना त्यांनी कोथरूड च्या शिवसृष्टी साठी आवाज टाकला आणि पुन्हा त्यांचे पोलीसंकरवी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पुढे अजित पवार भाजपच्या सरकार मध्ये सामील झाल्यावर त्यांनी अजित दादांचे नेतृत्व स्वीकारले आणि राष्ट्रवादीची धुरा आक्रमकपणे शहरात राबविली. याच वेळी आपल्या आजवरच्या कामाचे श्रेय आमदारकीच्या रूपातून तरी मिळावे या राजकीय महत्त्वाकांक्षेच्यासाठी नेत्यांची दारे ठोठावली पण त्यांना आश्वासना शिवाय काही मिळाले नाहीच तरीही त्यांनी पक्षाचे काम अविरत पणे सुरु ठेवले. आता महापालिका निवडणुका समोर असताना आणि खुद्द अजित दादा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असतानाही मानकर यांच्यावर पोलिसांनी एका जमिनीच्या व्यवहारात त्यांना मिळालेल्या रकमेबाबतचे कागदपत्रे बोगस असल्याचा दावा करत मानकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.हा त्यांना मोठा धक्का होता . खुद्द अजित दादा पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याच शहर अध्यक्षांवर गुन्हा दाखल होण्यापूर्वीच हि माहिती अजितदादांना नसेल असे मानायला कोणी तयार नसताना आज पुन्हा भावनिक होऊन दीपक मानकर यांनी अखेरीस आपल्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
मानकर यांनी अजितदादांना दिलेल्या पत्रात काय म्हटले आहे वाचा जसेच्या तसे …..
आदरणीय दादा,आपल्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मी सन २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश केल्यानंतर पक्ष वाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी मी सदैव प्रामाणिक प्रयत्न केले. आपण मला विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली तेव्हापासून आजपर्यंत उपमहापौर, नगरसेवक, शहराध्यक्ष ह्या विविध पदांची जबाबदारी देऊन मला सामाजिक व राजकीय काम करण्याची संधी दिली.
जुलै २०२३ मध्ये झालेल्या राजकीय बदलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे विभाजन झाले व आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी क्षणाचा न विचारता मी आपल्यासारख्या भक्कम नेतृत्वासमवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आपणही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत दिनांक ६ जुलै २०२३ रोजी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.
मला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मी त्यावेळी पक्षाचे नाव व चिन्ह यांचा निर्णय होण्याअगोदर पक्षाला पाठींबा म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयात जी प्रतिज्ञापत्र द्यायची होती त्यामध्ये पुणे शहरातून मी सुमारे ९५०० प्रतिज्ञापत्र गोळा करून महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे जमा केले आहेत. शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असताना महाराष्ट्रात नसेल इतकी मोठी जम्बो कार्यकारिणी करत फादर बॉडी, महिला, युवक, युवती, विद्यार्थी यांसह विविध सेलवर सुमारे १५०० पेक्षा जास्त पदाधिकात्यांची नियुक्ती करून पक्षाचे व आपले काम करण्याची संधी देत पुणे शहरात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराअंतर्गत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य, साहित्य-कला, क्रीडा, वारकरी सांप्रदाय, सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रात २०० पेक्षा जास्त कार्यक्रम घेत तळागाळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची व आपली भूमिका स्पष्टपणे पोहचवली. तसेच माझ्या माध्यमातून पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुमारे १ लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सभासद नोंदणी पुस्तिकांचे आमदार, नगरसेवक, तसेच पदाधिकारी यांना वाटप करण्यात आलेले आहे. त्यातील अनेक सभासद नोंदणी पुस्तिका पक्ष कार्यालय येथे जमा झालेले आहेत. आपल्या आदेशाप्रमाणे तसेच प्रदेशाध्यक्ष खा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सुचनेनुसार आपला पक्ष व पक्षाची विचारधारा ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुणे शहरातील सर्व घटकातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवत असून नागरिकांच्या समस्या आजही सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
मात्र माझा वाढता राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे. मी काही वर्षापूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता ३-४ दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. सदर गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक तसेच माझे राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदर आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही. या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. आदरणीय दादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष खा.श्री.सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कायम ठेवण्यासाठी मी अध्यक्ष झाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आलेलो आहे.
तरी आपणास नम्र विनंती करतो की, माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा.



