सद्यस्थितीला रस्ता नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी तातडीने परवानगी द्यावी
मुंबई: धानोरी ते चऱ्होली प्रस्तावित डी. पी. रस्त्यासाठी आवश्यक असलेली वनविभागाची परवानगी तातडीने मिळावी, अशी मागणी आमदार बापूसाहेब पठारे यांनी महाराष्ट्र राज्य वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. पठारे यांनी भेट घेऊन निवेदन दिले.
धानोरी सर्व्हे नंबर ५ ते चऱ्होली हद्द या दरम्यानच्या डी. पी. रस्त्याचे काम पुणे महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आले आहे. मात्र, प्रस्तावित मार्गिकेतील काही भाग वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्या ठिकाणी ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे रस्त्याच्या कामात अडथळा येत आहे व नागरिकांना यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.
या संदर्भात बोलताना आमदार पठारे म्हणाले, “धानोरी, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, कळस, येरवडा, लोहगाव व चऱ्होली या भागातील रहिवाशांसाठी धानोरी ते चऱ्होली जोडणारा हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे. सद्यस्थितीत पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. पावसाळा जवळ आल्याने हा रस्ता तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे.”
वनमंत्री गणेश नाईक यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लवकरात लवकर या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिल्याचे आमदार पठारे यांनी सांगितले.

