राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय लष्कराने पाकिस्तानात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक केले आहे. भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या 9 ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय लष्कराने मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तानातील 9 अतिरेकी अड्डे नष्ट करण्यात आले. या अतिरेक्यात पाकिस्तानी अतिरेकी संघटनांचे वरिष्ठ म्होरके ठार झाल्याची माहिती आहे. त्याची पुष्टी आज जसजसा वेळ पुढे सरकेल तसतशी होण्याची शक्यता आहे. तूर्त या हल्ल्यानंतर पाकिस्तानात एकच खळबळ माजली. शरद पवारांनी या हल्ल्यावर आनंद व्यक्त करत भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे.
शरद पवार या कारवाईवर आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.
या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! जय हिंद!
भारतीय हवाई दलाने मंगळवारी मध्यरात्री जैश ए मोहम्मद, हिजबुल मुज्जाहिद्दीन, लश्कर ए तोयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनांच्या अड्ड्यांवर हल्ले केले. त्यात अनेक अतिरेकी मारले गेल्याची माहिती आहे. भारतीय लष्कराने या हल्ल्यात एकही पाकिस्तानी नागरिक किंवा सैनिक मारले गेला नसल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात केवळ बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या 3 शहरांमधील अतिरेकी अड्ड्यांना नष्ट केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

