पुणे, दि. 29: नागरिकांनी आपल्या परिसरात अनधिकृत संस्था सुरु असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किंवा चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क साधावे; असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशिर बालगृह, वसतीगृह आणि अनाथाश्रम चालविले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत, या संस्थामध्ये बालकांना डांबून ठेवले जात असून त्याचे शारिरीक व मानसिक व लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबींचा विचार करता बालकांवरील अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
याबाबी बालन्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ तसेच महाराष्ट्र राज्य बालन्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) नियम २०१८ मधील तरतुदींचे उल्लघंन करणाऱ्या आहेत. या कायद्यानुसार मान्यता, नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या संस्था चालविणाऱ्या व्यक्तीस एक वर्षाचा कारावास आणि एक लाख रुपये किंवा त्याहुन अधिक दंडाची तरतूद आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

