दिनानाथ चे विश्वस्त मंडळ बरखास्त करा,मंगेशकर कुटुंबाची चुप्पी कर्कश्श
पुणे- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे. डॉक्टर, दीनानाथ रुग्णालय यांना वाचवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत असल्याचा आरोप करत सपकाळ यांनी दिनानाथ चे विश्वस्त मंडळ बरखास्त करा अशी मागणी केली आहे त्याच बरोबर मंगेशकर कुटुंबाची चुप्पी कर्कश्श असल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे.
सपकाळ म्हणाले, रुग्णालयावर आणि डॉ केळकरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे त्या ठिकाणचं विश्वस्त मंडळ आहे. ते नियमावलीला बाजूला सारत आहे. संकेतांना बाजूला सारत आहे. तिथे वारेमाप पैसे लुबाडला जात आहे. हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावं. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्याठिकाणी दुसरं विश्वस्त मंडळ स्थापित करावं. ही आमची असणारी मागणी आहे. मात्र त्यास सरकार वाचवत आहे. आणि दुसरीकडे मंगेशकर परिवाराने जे साधलेली चुप्पी जी आहे ही देखील कर्कश आहे.आम्ही सातत्यानं आरोप करत होतो की सरकारला प्रकरण दडपायचं आहे. आणि कारण नसताना चुकीची बाजू ते घेत आहेत. खऱ्याला खरं म्हणणं चांगल्याला चांगलं म्हणणं हा चांगुलपणा आहे. मात्र या सरकारने हा चांगुलपणा नष्ट केलेला आहे. एक मातृत्वासाठी असलेल्या एका भगिनीचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यूचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना थेट वाचवलं जातंय. एक जी संस्था आहे रुग्णालय जे आहे मंगेशकर रुग्णालय हे रुग्णांच्या सेवेकरता आहे. मात्र ते त्याठिकाणी धंदा करत आहे. त्याठिकाणी सावकारी सुरू आहे. त्याठिकाणी दरोडा घालून पैसे द्या तरच उपचार करू. अशी असंवेदनशील अमानवीय व अधर्माची बाजू ही त्याठिकाणी लावून धरल्या जात आहे.
डॉ घैसास यांच्याकडून वैद्यकीय सेवेचीअपेक्षा आहे. जेव्हा डॉक्टर माणूस होतो. तेव्हा शपथ घेतो की, मी रुग्णांना सेवा प्रदान करेल. मात्र ते लिहून देतात की, दहा लाख रुपये अगोदर जमा करा हे काय लावलंय आणि अशा सगळयांना वाचवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहे. आता आपल्या सगळ्यांसमोर थेट पुरावा आला आहे. ज्यामध्ये तारीख पे तारीख हे आपण ऐकलं होतं. आता रिपोर्ट पे रिपोर्ट सुरु झाले आहे.रिपोर्ट निर्दोष करणार नाही. जोपर्यंत क्लीन चिट देणार नाही तोपर्यंत आम्ही तपासण्या आणि समित्या गठीत करत राहू. असा त्याचा अर्थ आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझीट अभावी तनिषा भिसे या गर्भवतीला उपचार सुरु करण्यास असमर्थता दाखविली , किंवा उशीर केला , किंवा टाळाटाळ केली हे साधारणपणे दिसत असताना अन्य रुग्णालयात तिच्या मृत्यूचे गंभीर प्रकरण घडून १५ दिवस उलटून गेले आहेत.चौकशांसाठी चार समित्या नेमल्या गेल्या, त्यांचे अहवालही सादर झाले, मात्र अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात चौकशी समित्या, शासन, पोलिस प्रशासन या सर्व यंत्रणांना अपयश आले आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यात शासन आणि पोलिस यंत्रणा संभ्रमात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार की नाही, याबाबतचा निर्णय कोण घेणार? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. भिसे कुटुंबीयांना पाठीशी असल्याचे आश्वासित करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत नेमका काय निर्णय घेणार? याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.

