
मुंबई- येथील ईडी कार्यालयाबाहेरील आंदोलनावेळी काँग्रसच्या खासदार वर्षा गायकवाड जखमी झाल्या आहेत. या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या धक्काबुक्की मध्ये वर्षा गायकवाड किरकोळ जखमी झाल्या. त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वर्षा गायकवाड यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे आहेत. या विरोधात काँग्रेस देशभरात आंदोलन करत आहेत. तर मुंबई काँग्रेसच्या वतीने देखील मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. या दरम्यान ही घटना घडली आहे.
या संदर्भात वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या राजकीय हेतूने प्रेरित आरोपपत्राविरुद्ध मुंबई काँग्रेसच्या वतीने शांततेत निदर्शने करत होते, परंतु मुंबई पोलिसांनी आम्हाला निदर्शने करू दिली नाही. इतर कार्यकर्त्यांसह माझ्यावरही मारहाण करण्यात आली आणि आम्हाला अलोकतांत्रिक पद्धतीने ताब्यात घेण्यात आले. भाजपला माहित आहे की काँग्रेस हा या देशात लोकशाहीचे समर्थन करणारा आणि लोकांच्या हक्कांसाठी लढणारा एकमेव पक्ष आहे. त्यांना राहुल गांधींच्या लोकप्रियतेची भीती आहे. काँग्रेस ही त्यांच्या फॅसिस्ट कारस्थानांविरुद्ध उभी असलेली एकमेव शक्ती आहे आणि म्हणूनच ते खोटे खटले दाखल करून धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही झुकणार नाही. आम्ही जे योग्य आहे त्यासाठी आवाज उठवत राहू, अशा इशारा या वेळी खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

वर्षा गायकवाड यांनी केलेली पोस्ट देखील पहा…
नॅशनल हेराल्डवरील बोगस खटल्याच्या प्रकरणात आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि माननीय राहुल गांधी जी यांच्याविरोधात भाजपच्या ‘इलेक्शन डिपार्टमेंट’ बनलेल्या ED मार्फत खोट्या चार्जशीट दाखल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की, ते सर्वात मोठे घाबरगुंडे आहेत. त्यांना भीती वाटते सोनियाजी आणि राहुल गांधी यांच्या हिंमतीची, त्यांच्या सत्याची, त्यांच्या न डगमगणाऱ्या लढ्याची आणि न्यायासाठीच्या वचनबद्धतेची..!
आज मुंबईतील ED कार्यालयासमोर मोदींच्या हुकूमशाही सरकारनं सूडबुद्धीनं केलेल्या या कारवाईच्या विरोधात मुंबई काँग्रेसकडून शांततामय, लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात आलं. पण यामुळे हादरलेल्या फडणवीस सरकारनं मुंबई पोलिसांचा वापर करून आमच्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत — मला आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, अमानवी पद्धतीनं ताब्यात घेण्यात आलं. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना दुखापत झाली. राज्य सरकारच्या या दडपशाहीचा मी तीव्र शब्दांत निषेध करते.
काँग्रेस हा देशात लोकशाही जपणारा आणि जनतेच्या हक्कांसाठी सातत्यानं झगडणारा एकमेव पक्ष आहे, हे भाजपला ठाऊक आहे. राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच त्यांना घाम फुटतोय. म्हणूनच भाजप सरकार खोटे खटले आणि बनावट आरोप लावून आमचा आवाज दडपण्याचा कट रचत आहे. पण काँग्रेस इंग्रजांपुढे झुकली नाही, तर मोदी-शहांच्या या नवीन ईस्ट इंडिया कंपनीपुढेही कधीच झुकणार नाही. दडपशाही आणि अन्यायाविरुद्ध आम्ही लढत राहू. सत्य, संविधान आणि लोकशाहीच्या बाजूनं आमचा लढा अखंड सुरू राहील.
जय संविधान, जय काँग्रेस!

