पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने चैत्रोत्सवाचे आयोजन
पुणे : ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज, तसेच सत्यशोधक समाज या सर्व चळवळी एकेश्वरवादी होत्या. त्यांनी केवळ धार्मिक विचार न मांडता समाजसुधारणेचा व्यापक विचार मांडला. प्रार्थना समाजाने भागवत धर्मातील तत्त्वांचा स्वीकार करून ‘नव-भागवत’ तत्त्वज्ञान विकसित केले. प्रार्थना समाज केवळ प्रार्थना करणारा समाज नव्हता, तर त्यांचा समाजसुधारणेचा आवाका फार मोठा होता, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
बुधवार पेठेतील पुणे प्रार्थना समाजाच्या हरिमंदिर प्रवेशाला ११६ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त चैत्रोत्सव साजरा करण्यात आला. या चैत्रोत्सवात सदानंद मोरे यांचे ‘ रानडे -भांडारकर’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा जोग, सचिव डॉ. दिलीप जोग, खजिनदार प्रशांत पाडवे, ज्येष्ठ सदस्य उषाताई शर्मा, श्री. भास्कर मुजुमदार, डॉ. शिल्पा मुजुमदार, श्री. धनराज निंबाळकर, डेक्कन कॉलेजचे डॉ. पड्डैय्या, डॉ . सचिन नाईक, डॉ. माधवी कोल्हटकर, मुंबईचे श्री. रेगे तसेच अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. डॉ. सदानंद मोरे म्हणाले, संतपरंपरेत जसे ज्ञानोबा – तुकाराम हे जोडनाव घेतले जाते तसेच सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या क्षेत्रात रानडे – भांडारकर हे जोडनाव आहे. दोघांनी प्रार्थना समाजाच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा उचलला. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्याकडे त्या काळात संत म्हणून पाहिले जायचे, एवढी त्यांची ख्याती होती. तर डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची ख्याती जगभर संस्कृत पंडित व प्राच्यविद्या संशोधक म्हणून होती. रानडे हे उत्तम निरुपणकार तर भांडारकर हे उत्तम कीर्तन करत असत, व त्यासाठी त्यांनी पदे रचली व रागदारी संगीत शिकण्यासाठी उस्ताद अब्दुल करीम खाँ यांची शिकवणी लावली, तसेच ते दररोज कुटुंबियांसमवेत एकतारीवर भजने म्हणत असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रार्थना समाज व सत्यशोधक समाज यांचे सदस्य एकमेकांच्या कार्यात सहभागी होत असत असेही त्यांनी सांगितले.
डॉ. दिलीप जोग यांनी प्रास्ताविक केले व डॉ. सुषमा जोग यांनी आभार मानले.