पुणे- बेशिस्त वाहन चालक , बेशिस्त पार्किंग या समस्या आहेतच पण पोलिसांनी लपून छपून .. पकडला तो चोर …या भावनेने निव्वळ दंडवसुली करण्याच्या वागणुकीने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे असा आरोप करत त्या पेक्षा पोलिसांनी वाहतूक नियमांच्या कामाकडेच प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.अशी जोरदार मागणी भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पोलीस उपायुक्तांच्या नावे काढलेल्या पत्रकातून केली आहे. पोलीस समोर असल्यावर कोणीही नियम मोडण्याचे साहस करणार नाही आणि पोलिसांच्या समोर नियम मोडून जाणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी असेही खर्डेकर यांनी म्हटले आहे.
त्यांनी असे म्हटले आहे कि,’शहरात विविध ठिकाणी दुचाकीं वर कारवाई करण्यात येते व ती योग्य देखील आहे. बेशिस्त वाहन चालक, बेशिस्त पार्किंग ही समस्या आहेच. मात्र नो पार्किंग मधील दुचाकी उचलताना अनेक ठिकाणी वादावादी च्या घटना घडतात. त्याचे व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल होत असतात.मी रहात असलेल्या कर्वेनगर भागात रोजच कारवाई होत असते.कर्वे स्त्री शिक्षण संस्था ते दुधाने लॉन्स च्या अरुंद रस्त्यावर आपली गाडी दुचाकी उचलायला लागली की तेथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे .सध्या वाहतूक पोलीस आणि सामान्य नागरिकांमध्ये अनावश्यक दुरावा निर्माण झालाय. यासाठी मी खालील मागण्या आग्रहपूर्वक मांडत आहे….
1) अलका चौक ते शहरभर कुठे ही बघा वाहतूक पोलीस घोळका करून, सिग्नल पासून लांब लपून छपून उभे असतात. नो एंट्रीत देखील कुठे तरी मध्ये उभे असतात. यातून नागरिकांना प्रश्न पडतो की शहर वाहतूक कोंडीत अडकलं असताना वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमनासाठी आहेत की फक्त पावत्या फाडायला. तरी याबाबत पोलिसांना योग्य सूचना देऊन हे प्रकार बंद करावेत ही मागणी करत आहे.
2) दुचाकी उचलणारी गाडी आल्यावर जर नियम मोडणारी एखादी व्यक्ती जागेवर दंड भरायला तयार असेल तर तो भरून घ्यावा, केवळ निधी वाढीसाठी दुचाकी लांब पोलीस चौकीवर नेऊ नये ह्याबाबत निर्देश द्यावेत.
3) दुचाकी वर कारवाई करताना शेजारी उभ्या असलेल्या चार चाकी किंवा तीन चाकी टेम्पो वर कारवाई करत नाहीत आणि याचे तीव्र पडसाद उमटतात. तरी दुचाकी उचलताना जर नो पार्किंग मध्ये चार चाकी असेल तर त्याला जॅमर लावावा अथवा मोबाईल वरून दंड लावल्यास सामान्य नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार नाही.तरी तसे आदेश निर्गमित करावे ही विनंती.
4) रोजच वाहतूक कोंडी होणाऱ्या भागात वाहतूक पोलीस अथवा वॉर्डन दिसत नाहीत, तरी आपणच दिलेल्या आश्वासनानुसार ते दिसावेत ही माफक अपेक्षा.
5) शहरात अनेक ठिकाणी पी 1,पी 2,नो पार्किंग, नो एंट्री इ वाहतूक नियमनाच्या फलकांची दुरावस्था दिसून येते. तरी हे फलक सुस्थितीत करण्याबाबत पावले उचलावीत ही विनंती.
6) शहरातील जड वाहनांची वाहतूक सर्रासपणे सुरु असल्याचे दिसत आहे. सोबत जोडलेल्या फोटोत एकीकडे पोलीस दुचाकी वर कारवाई करत आहेत तर दुसरीकडे मोठा मिक्सर जाताना दिसत आहे. ह्या विरोधाभासामुळे नागरिक पोलीसांबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसतात. तरी ह्या परिस्थितीत बदल व्हावा.

