राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. या प्रकरणी त्यांनी गॅस दरवाढीवरील मोदी सरकारचे एक कथित खुले पत्र सोशल मीडियावर शेअर करत ‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे’ असा सणसणीत टोला हाणला आहे.
केंद्र सरकारने सोमवारी स्वयंपाकाच्या गॅसमध्ये तब्बल 50 रुपयांची दरवाढ केली. या निर्णयावरून केंद्रावर चौफेर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मोदी सरकारचे जनतेला एक कथित खुले पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या पत्राद्वारे मोदी सरकारच्या धोरणावर तिरकस टीका करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धोरणांचा समाचार घेतानाच शरद पवार गटाने जनतेला आता ही दरवाढ सहन करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
शरद पवार गटाने आपल्या ट्विटर अकाऊंटरवर हे पत्र शेअर केले आहे. गॅस दरवाढीवर मोदी सरकारचं खुलं पत्र, असे शिर्षक असणाऱ्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, प्रिय देशवासीयांनो, तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्तेची ऊब अनुभवत आहोत. पण आम्ही सत्ताधीश होण्यासाठी केलेल्या करामतीची किंमत चुकवण्याची वेळ आता आली आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची सौम्य दरवाढ करतोय. तर आता तुम्हाला महागईची धग सहन करावी लागेल. तर कृपया निमूटपणे सहन करा. वाईट वाटून घेऊ नका. ‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे’, हे तुम्हाला एव्हाना कळालं असेलच. चिंता करू नका… पुढील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा गॅस दर कमी करू व सामान्य माणसाच्या हितासाठी तुमचं मत मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, तुमचं लाडकं, (महागाईच्या गोदीत बसलेलं) मोदी सरकार.उल्लेखनीय बाब म्हणजे सरकारने केलेली गॅस दरवाढ ही आजपासून म्हणजे 8 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.

