मुंबई-स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या एफआयआरमध्ये कुणाल कामराला देण्यात आलेले अंतरिम संरक्षण न्यायालयाने 17 एप्रिलपर्यंत वाढवले आहे. मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामराविरोधात एफआयआर नोंदवला होता. मद्रास उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर आज यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
कुणाल कामराने त्याच्या ‘नया भारत’ शोमध्ये ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन करत त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार ‘ म्हटले होते. नंतर त्याने ही क्लिप यूट्यूबवरही अपलोड केली. यावर संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तर आमदार मुरजी पटेल यांनी आक्षेप व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मद्रास उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत कामरा यांना 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर आज पुन्हा यामध्ये वाढ करण्यात आली असून आता कुणाल कामराला 17 एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण देण्यात आले.
मुंबई पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी कामराची मुंबई हायकोर्टात धाव
दरम्यान, कुणाल कामरा यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी मुंबई पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. कामरा यांनी 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माझ्याविरोधात नोंदवलेला एफआयआर हा संविधानाने दिलेल्या त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस.व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती एस.एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर होईल.
दुसरीकडे कुणाल कामरा तिसऱ्यांदा समन्स बजावूनही मुंबई पोलिसांसमोर हजर झाला नाही. गत 2 एप्रिल रोजी त्याला तिसरा समन्स पाठवण्यात आला होता. त्यात त्याला 5 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. याआधी 31 मार्च रोजी मुंबई पोलिस कॉमेडियन कुणाल कामराच्या घरी पोहोचले होते. यावर कामराने सोशल मीडियावर लिहिले होते – ‘तुम्ही अशा पत्त्यावर जात आहात जिथे मी गेल्या दहा वर्षांपासून राहत नाही. हा तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे.
मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध तीन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही प्रकरणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंधित आहेत. 29 मार्च रोजी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली तक्रार जळगावच्या महापौरांनी दाखल केली आहे, तर उर्वरित प्रकरणे नाशिकमधील दोन वेगवेगळ्या व्यावसायिकांनी दाखल केली आहेत.
या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोन समन्स बजावले आहेत. त्याचप्रमाणे, कामरा यांच्याविरुद्धची विशेषाधिकार भंगाची नोटीस महाराष्ट्र विधान परिषदेतही स्वीकारण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे लिहिल्यानंतर वादात सापडलेल्या विनोदी कलाकार कुणाल कामरा यांना पोलिसांनी 31 मार्च रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पोलिसांनी आतापर्यंत त्यांना दोन समन्स बजावले आहेत.