मुंबई- मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला आहे. या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी तुषार खरात याच्या संपर्कात होते. या प्रकरणाचे विरोधात जे व्हिडिओ तयार केले गेले, ते आधी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले असल्याचा मोठा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून राज्यभरात चांगलाच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांच्या वतीने विधिमंडळात मांडण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे फडणवीसांनी आज दिली. या वेळी त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याचा कट कशा पद्धतीने आखला गेला, याची माहिती दिली. तसेच या प्रकरणावरून त्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तुषार खरात आणि इतरांनी जयकुमार गोरे प्रकरणात विरोधात व्हिडिओ तयार केल्यानंतर, ते व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी होईल. मात्र, त्यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आपण राजकीय शत्रू नाही तर राजकीय विरोधक आहोत. मात्र, अशा प्रकारे कोणाला जीवनातून उठवून टाकायचे, अशा प्रकारचे राजकारण होत असेल तर हे चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही तिघे एकमेकांच्या पायात पाय घालणार नाही. तर एकमेकांच्या हातात हात घेऊन काम करणारे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दादा एकदम दरडावून बोलतात, त्यामुळे त्यांच्याविषयी कोणी बोलत नाही. मात्री आम्ही दोघे, शांततेत बोलत असतो. मात्र तुम्ही कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केला, तरीही आमच्यात एकी कायम राहणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड ज्यावेळी राज्यातील घटना घडामोडींबद्दल बोलत होते. त्यावेळी ते बांगलादेश विषय बोलता की काय? असा मला प्रश्न पडत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दंगेखोर आणि बलात्कार करणाऱ्यांचा एवढा पुळका का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. अक्षय शिंदे याचा एनकाऊंटर झाला नसता तर चांगले झाले असते. मात्र तो स्वातंत्र्य सेनानी असल्यासारखी छाती बडवली जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. दंगेखोर आणि बलात्कार यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. मात्र त्यांच्या विषयी कोणाच्या मनात संवेदना निर्माण झाली असेल तर ते योग्य नाही. त्या संदर्भात त्यांची मने तपासूनच पहावी लागतील, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. आप इतना भी गरज गरज के ना बरसों, की मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊं। खैर मुश्किल मुझ में तो अभी साख बाकी है, आप खुद अपनी फितरत के बारे में सच बोलो, आप में वह पहले वाली बात कहा बाकी है। सीबीआयने अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास केला आहे. त्यामुळे सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. या प्रकरणात आधी फोन शोधून काढला आणि नंतर फोन मधून डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यात तपास यंत्रणेला यश आले आहे. या प्रकरणातले जे गुन्हेगार आहेत त्यांनी अतिशय निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली आहे. या गुन्हेगारांना जी सर्वोच्च शिक्षा आहे, ती शिक्षा दिली जाईल. यासाठी सर्व प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केले जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी सभागृहात दिले आहे.