मुंबई-सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टनुसार, सुशांतची हत्या झाली नसून आत्महत्याच आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीला क्लीन चिट देण्यात आली आहे. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्ल चढवला आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे भाजपाचे घाणेरडे राजकारण भाजप वर उलटले, असे ते म्हणाले. रिया सारख्या एका मुलीला भाजपच्या गलिच्छ राजकारणात त्रास दिला गेला. सुशांतसिंगच्या नातेवाईकांना वेठीस धरले गेले. असा आरोप देखील सचिन सावंत यांनी भाजपवर केला.
सचिन सावंत म्हणाले की, सीबीआयने सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यूची चौकशी बंद केली आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे भाजपाचे घाणेरडे राजकारण भाजप वर उलटले आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी तसेच बिहार निवडणुकीत यश मिळविण्यासाठी सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा भाजपने गैरवापर केला. एवढेच नाही तर सीआरपीसीचे उल्लंघन करुन बिहारमध्ये झीरो एफआयआर नोंदवून सीबीआयकडे केस वर्ग करण्यात आली. यातून कायद्याचेही तीन तेरा वाजले. तीन तीन तपास यंत्रणा लावण्यात आल्या. जागतिक दर्जाच्या मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली.
सचिन सावंत पुढे म्हणाले, रातोरात लाखो फेक अकाउंट सोशल मीडियावर तयार करुन त्यामध्ये सुशांत सिंगच्या आत्म्यास बोलावण्याचे थोतांड पसरवून अनेक कथा रचून सुशांतची हत्या झाल्याचे व महाविकास आघाडी सरकारने ते दाबल्याचे चित्र तयार करण्यात आले. हल्ली हल्ली पर्यंत सातत्याने सुशांतसिंगचा सोशल मीडियावर विषय ट्रेंड करण्यात येत होता. एम्सने अहवाल देऊन अनेक महिने होऊन ही सीबीआय साडेचार वर्षे गप्प बसली. मी सातत्याने हा विषय लावून धरत होतो.
सचिन सावंत म्हणाले, रिया सारख्या एका मुलीला भाजपच्या गलिच्छ राजकारणात त्रास दिला गेला. सुशांतसिंगच्या नातेवाईकांना वेठीस धरले गेले. यातून सीबीआय व ईडीसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणांचा राजकीय उपयोग होतो हे अधोरेखित झालेच, पण त्यांची विश्वासार्हता ही प्रश्नांकीत झाली आहे. पालघर साधूंचे प्रकरण असो वा दिशा सालीयनच्या मृत्यूची चौकशी असो विरोधी पक्षांची बदनामी करण्याचे भाजपचे हीन राजकारण देशासाठी किती घातक आहे हे स्पष्ट होते. शेवटी सत्याचा विजय होत असतोच! जनतेने ओळखावे! भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा जाहीर निषेध, असे सचिन सावंत यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.