-माजी आमदार मोहन जोशी यांची टीका
पुणे : मुळा आणि मुठा नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी जायका प्रकल्प हाती घेऊन नऊ वर्ष झाली तरी अजूनही निम्मेही काम पूर्ण झालेले नाही, निवडणूक प्रचारात मोठमोठी आश्वासने देणारे भाजपचे नेते आता मात्र निवांत आहेत, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
जायका प्रकल्पाच्या कामाची प्रगती ५० टक्क्यापेक्षा अधिक नाही, असे महापालिका प्रशासनच्या निवेदनातून स्पष्ट होत आहे. स्मार्ट सिटी, नदी सुधार योजना, रिंगरोड, मेट्रोचे शहरभर जाळे अशा मोठमोठया घोषणा भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केल्या. त्यापैकी जायका प्रकल्प ही सुद्धा त्यातीलच एक घोषणा आहे. या सर्वच घोषणा अर्धवट अवस्थेत असून निवडणुका झालेल्या असल्याने भाजपचे मंत्री, खासदार, आमदार असे सर्वच जण या बाबत सोयीस्कर मौन पाळून आहेत, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मुठा आणि मुळा नद्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा फेर वापर शेतीसाठी करावयाचा असा हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत राबविला जात आहे. केंद्र सरकारमध्ये प्रकाश जावडेकर पर्यावरण राज्यमंत्री असताना तो प्रकल्प मंजूर झाला. या निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिरात जावडेकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. भाजपने गाजावाजा, प्रसिद्धी खूप केली. निवडणूक प्रचारात आश्वासने दिली. २०१६ साली कामाला सुरुवात झाली. ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. काम सुरू होऊन ९ वर्षे लोटली. मुदतीत ५० टक्क्यांहूनही अधिक काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पालिका प्रशासन मुदतवाढ मागत आहे. तसेच मध्यंतरी जादा पाणी वापराबद्दल राज्य सरकारने महापालिकेला भुर्दंड ठोठावला. त्याही वेळी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास महापालिका अपयशी होत असल्याचा ठपका महायुतीच्या सरकारने ठेवला होता. याप्रकरणी एकंदरच टोलवाटोलवी आणि भाजपचा नाकर्तेपणा दिसून येतो, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.