मुंबई-आता नागपूरमधील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असून पोलिसांकडून दोषींना शोधून काढण्याचं काम चालू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा विधानसभेत निवेदन दिलं आहे.“नागपूरच्या सीपींनी सांगितलं की हे पूर्वनियोजित होतं की नाही याची आम्ही चौकशी करत आहोत. अजून अंतिम निष्कर्षापर्यंत आलेलो नाही. त्यामुळे ते वेगळं बोलले आणि मी वेगळं बोललो असं काहीही नाही,पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अद्दल घडवणारच, या भूमिकेचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला. मी पुन्हा सांगतो, नागपूर प्रकरणात ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले असतील, त्यांना कबरीतूनही खोदून काढू. सोडणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. पण पोलिसांवर हल्ला क्षम्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई नियोजित वेळेत केली जाईल”, असं फडणवीस म्हणाले.१९९२ नंतर नागपुरात कधीही दंगल झालेली नाही. परवाची झालेली घटना काही लोकांनी जाणीवपूर्वक घडवून आणला हे लक्षात येतं. तिथे औरंगजेबाची कबर जाळली गेली. त्यावर कुठलीही आयात लिहिलेली नव्हती. आम्ही या गोष्टीचा सखोल तपास केला आहे. पण जाणीवपूर्वक आयाती जाळल्या अशा प्रकारचे संदेश पसरवण्यात आले आणि त्यातून ही पुढची घटना घडली”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी मांडली. गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही प्रमुख राज्ये महाराष्ट्राच्या पुढे असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच दोन दिवसांपासून चर्चेत आलेल्या नागपूर शहराचा सातवा क्रमांक लागत असल्याचे ते म्हणाले. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत 2 हजार 586 ने घट झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही गोष्ट खरी आहे की देशामध्ये महाराष्ट्र एक अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. देशामध्ये जर आपण तुलना केली तर आपला क्रमांक गुन्हेगारीमध्ये आठवा आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही जी काही महत्त्वाची राज्य आहेत, ती क्राइम रेटमध्ये आपल्या पुढे आहेत. आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही. पहिल्या दहामध्ये सातव्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसते. पण ते यासाठी दिसते की नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचा जवळपास 25 टक्के भाग हा सामील केला.
एनसीआरबीच्या डेटामध्ये ते सध्याची लोकसंख्या पकडत नाही. त्यांचे म्हणणे असते की, आम्ही फक्त जनगनणेचीच लोकसंख्या पकडून, त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढलेले दिसते. मात्र लोकसंख्या 2011 चीच आहे. जर आपण आताची लोकसंख्या पकडली तर नागपूर हे 22 व्या 23 व्या क्रमांकावर जाते. त्यामुळे विचार केला तर पहिल्या दहामध्ये आपले कोणतेही शहर नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मुंबई सारखे शहर हे पंधराव्या क्रमांकावर आहे. पुणे 18 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, दुसऱ्या क्रमांकावर जयपूर आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंदूर आहे. चौथ्या क्रमांकावर कोची आहे. पाचव्या क्रमांकावर पाटणा आहे. गाझियाबाद, कोझीकोड आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
त्यामुळे तुलनेने महाराष्ट्रात जी शहरे आहेत, शहरीकरण आणि विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देखील इथे कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. हे होत असताना आपण जर पाहिले तर एकूण गुन्ह्याची संख्या आपण पाहिली तर आकडेवारी ही महत्त्वाची नसतेच, आकडेवारी ही मिसलिडींग असते. वस्तुस्थिती काय आहे हे महत्त्वाचे असते. तरी देखील काही गोष्टी या आकडेवारीतूनच सांगाव्या लागतात. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत 2 हजार 586 ने घट झाली, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.