मुंबई-मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बेवड्यांनी आग लावली आहे. होळीनिमित्त मोठ्या संख्येमध्ये बेवडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंगलालगत असलेला दहिसर परिसरात गेले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास दहिसर नॅशनल पार्कच्या जंगलामध्ये अचानक मोठे आगीचे लोट दिसून आले. प्राथमिक माहितीनुसार ही आग तिथल्या बेवड्यांनी लावली आहे.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. जवळपास दीड तास या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही आग लावण्यात आली, त्यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र, आगीचे लोट दिसल्यानंतर घटना उघडकीस आली. वनवा लागण्याची घटना ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या रावलपाडा नियत क्षेत्रातील सर्वे नं. 345 ब मधील असून संध्याकाळी 6.30 च्या सुमारास लागलेली आग ही 8 वाजता कु. उ. बो. वनक्षेत्र अधिकरी, वन कर्मचारी आणि रॅपिड टीमच्या प्रयत्नाने पूर्णपणे विझविण्यात आली.
या घटनेबद्दलचा अधिक तपास आता पोलिसांकडून केला जातोय. संबंधित लोकांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. होळीनिमित्त शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळाला. जागोजागी पोलिसांकडून तपासणी केली जात होती. लोक होळी खेळण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते.