दुबई : टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ४९ व्या षटकात २५२ धावांचे लक्ष्य गाठले.रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी करत ७६ धावा केल्या. श्रेयस (४८ धावा), केएल राहुल (नाबाद ३४ धावा) आणि अक्षर पटेल (२९ धावा) यांनी धावांचा पाठलाग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.गोलंदाजीत कुलदीप यादवने सर्वात मोठी भूमिका बजावली, कारण त्याने दोन षटकांत दोन बळी घेत सामना भारताच्या बाजूने आणला. त्याने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल (६३ धावा) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

भारताने अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत पाकिस्तानसह सर्व टीकाकारांची तोंडं बंद केली. रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये साकारली आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. रोहित शर्माच्या चाणाक्ष नेतृत्वामुळे भारताने न्यूझीलंडला २५१ धावांत रोखले. भारतीय संघ विजयासाठी २५२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याानंतर रो’हिट’ शो सर्वांना पाहायला मिळाला. कारण रोहित शर्माने एकहाती तुफानी फटकेबाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. श्रेयस अय्यरनेही यावेळी ४८धावा केल्या खऱ्या, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. पण तरीही भारताने हा सामना जिंकला. भारताचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद आहे. त्याचबरोबर भारताने न्यूझीलंडचा २५ वर्षांपूर्वीचा बदला या विजयासह घेतला आहे. कारण २००० साली न्यूझीलंडने भारताला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारताने यावेळी चार विकेट्स राखून न्यूझीलंडला पराभूत केले आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.

भारत-न्यूझीलंड सामन्याचा स्कोअरबोर्ड
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड: मिशेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, काइल जेमिसन आणि विल्यम ओरूर्क.

न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला खरा, पण पहिल्याच षटकापासून रोहित शर्माने आपले इरादे स्पष्ट केले होते. यावेळी शुभमन गिल हा फक्त रोहित शर्माची फटकेबाजी पाहण्याचे काम करत होता. कारण रोहित शर्मा आपल्या पोतडीतून एकामागून एक फटके काढत होता. रोहित शर्माने आपले अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करायला लागला होता. रोहितला श्रेयस अय्यर चांगली साथ देत होता. पण यावेळी फिरकीपटूंनी या दोघांवर दडपण आणले आणि रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. रोहितने यावेळी सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७६ धावांची दमदार खेळी साकारली.