पुणे:महात्मा गांधींनी भारतामध्ये लोकशाहीची जागा निर्माण करून दिली. तसे झाले नसते तर भारताचा हिंदू पाकिस्तान झाला असता. सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे हेच स्वप्न आहे, पण ते पूर्ण होणार नाही. गांधींना मारणे म्हणजे लोकशाहीची जागा नष्ट करण्याचा प्रयत्न होता, असे मत ज्येष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. धर्म म्हणजे अस्मिताबाजी आणि धर्म म्हणजे द्वेष हे नाकारयचे असेल आणि धर्मचिकित्सेची जागा ठेवायची असेल तर गांधी नावाचा अवकाश अनुभवला पाहिजे. जात, धर्म आणि लिंग द्वेषाचे वातावरणाविरोधात सर्वांनी मिळून लढले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
गांधी विचार साहित्य संमेलनात ‘जात, वर्ग आणि लिंग संघर्ष गांधीजींच्या दृष्टिकोनातून’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. धम्मसंगिनी रमा, समाजशास्त्रज्ञ डॉ. श्रुती तांबे या परिसंवादात सहभागी झाले होते. रोहन गायकवाड यांनी अभ्यंकर यांचा सत्कार केला. रेश्मा सांबारे यांनी तांबे आणि धम्मसंगिनी रमा यांचा सत्कार केला.
धम्मसंगिनी रमा म्हणाल्या, जात ही व्यवस्था आहे. जात आणि पुरुषसत्ता यातून स्त्रीदास्य निर्माण झाले. याबाबतचे मूलभूत चिंतन गांधींच्या विचारात दिसत नाही. जात कशी काम करते, या व्यवस्थेबद्दल गांधींच्या विचारात हाती काही लागत नाही. पण, त्यांच्या उदारमतवादी विचारांत नंतर काही मांडणी दिसू लागते. जात ही ग्रामस्वराज्याचा गाभा आहे. जात व्यवस्था ही उत्पादक रचना आहे. हा गांधींचा पूर्वीचा विचार होता. नंतर त्यात प्रागतिक विचारांमुळे बदल झाला असे मला वाटते. जातीअंत म्हणजे अस्पृश्यता न पाळणे हे प्राथमिक काम आहे आहे. पण, साधन , संपत्तीमध्ये वाटा आणि शासन व्यवस्थेत स्थान असले पाहिजे. देशात जातीच्या वस्त्या आहेत. इथे लोकांना का राहावे लागते, याचे मूलभूत चिंतन गांधी विचारांचे सरकार सत्तेत असताना झाले नाही.
तांबे म्हणाल्या, धर्मावरून जगात दुफळी माजली आहे. भांडवलशाही वापरून जात, धर्माआधारे सत्ता राबवली जात आहे. ८५ टक्के आदिवासी विस्थापित झाले आहेत. विकासाच्या प्रक्रियेने त्यांना भिरकावून लावले आहे. जंगले उद्ध्वस्त झाली आहेत. हा आदिवासी आज शहरांत मेट्रोचे काम करत आहे. अशा वातावरणात माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळणार आहे का नाही ? गांधींमध्ये विरोधाभास होता पण कृतिशील लोकांच्या बाबतीत हा धोका असतो. गायपट्ट्यातील कर्मठ लोकांना घराबाहेर आणण्याचे काम गांधींनी केले.
गांधींना मारणे म्हणजे लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न होता: अजित अभ्यंकर
Date: