शाबासकी नको, पण बदनामी करू नका:एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. विरोधकांनी आम्हाला शाबासकी देऊ नये, तसेच बदनामही करू नये. फितरत हमारी सहन करने की न होती, तो हिंमत आपकी बोलने की ना होती, असा शेर ते यासंबंधी आपल्या अंदाजात म्हणाले. कोरटकर असो किंवा सोलापूरकर सरकार महापुरुषांचा अवमान करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले की, राज्यपालांनी महाराष्ट्राचे सुस्पष्ट चित्र राज्यापुढे मांडले. आम्ही विक्रमी बहुमताने निवडून आलो. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमची दमदार वाटचाल सुरू आहे. पण विरोधकांची कॅसेट उद्योग बाहेर गेल्यावरच अडकली आहे. विरोध भय्याजी जोशी यांच्या विधानाचे राजकारण करत आहेत. त्यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरणही दिले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मीच केली होती. आमचे सरकार छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आदी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही. अबू आझमी असो, प्रशांत कोरटकर असो किंवा राहुल सोलापूरकर यांनाही सोडणार नाही. शिंदे यांच्या या विधानाचे सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.
बीडमध्ये झालेले कौर्य आपण सर्वांनी पाहिले. ही विकृती वेळीच ठेचून काढण्याची गरज आहे. अशा लोकांना जेरबंद केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. बदलापूर, स्वारगेट घटना घडल्या. नराधम लाडक्या बहिणींवर अन्याय अत्याचार करत आहेत. सरकार त्यांनाही सोडणार नाही. बदलापूरला झालेली कारवाई सर्वांनी पाहिली, असा सूचक इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणला. ते म्हणाले, 2019 मध्ये सत्तेसाठी कुणी काय केले हे सर्वश्रूत आहे. वडिलांची छत्रछाया सोडून शत्रूंशी हातमिळवणी केली. काही नेते टूरिस्ट म्हणून येतात व जातात. पायऱ्यांवर चॅनेलचे बूम पाहून धूम ठोकतात. पण फितरत हमारी सहन करने की न होती, तो हिंमत आपकी बोलने की ना होती… अडीच वर्षांत आम्ही केलेली कामे लक्षात घ्या व पुढील 5 वर्षांचा अंदाज बांधा. आम्हाला तुमची शाबासकी नको, पण आमची बदनामी करू नका.
काँग्रेसने अंबादास दानवेंच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवल्याची कोपरखळीही शिंदे यांनी यावेळी ठाकरे गटाला मारली. ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही इतके मुद्दे मांडलेत, हे तुमचे शेवटचे अधिवेशन आहे का? तुमच्या मित्रपक्षाने तुमच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवला असला तरी आम्ही आहोत ना तुमचे मित्र, असे ते दानवेंना आपल्या गोटात येण्याचे सूचक संकेत देताना म्हणाले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, विरोधक उद्योगांबद्दल बोलेले, पण हे करार कागदावर राहणारे नाहीत. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात परतीय गुंतवणूक देखील वाढली आहे. माझ्या काळात दोवासमध्ये साडे सात लाख कोटींचे करार झाले. आताही 15 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे. सब्र का फल मिठा होता है. दीड ट्रिलियन गुंतवणूक फक्त एमएमआर रिजनमध्ये होत आहे. आमच्या सरकारने सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. आम्ही शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहिलो.

