मुंबई-छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे माझे दैवत आहेत. दैवतासोबत कोणीही स्वतःची तुलना करत नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे. परब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत स्वत:ची तुलना केली असल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्याला आता परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे.महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना कडक अशी शिक्षा मिळायला पाहिजे. त्यामुळे पुन्हा अशी कोणाचीच हिम्मत होणार नाही. अशी मागणी मी कालच सभागृहात केली असल्याचा दावा देखील अनिल परब यांनी केला आहे. इतकेच नाही तर प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना वाचवण्यासाठी हे पुढे आणलेले षडयंत्र असल्याचा आरोप देखील परब यांनी केला आहे.
या संदर्भात अनिल परब म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना मी राज्यपालांविषयी काहीही चुकीचे बोललेलो नाही. मी हाडाचा शिवसैनिक आहे. संभाजी महाराजांचा मी अपमान केलेला नाही. त्यामुळे माफी मागायचा प्रश्नच येत नसल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे माझे दैवत आहेत. दैवतासोबत कोणीही स्वतःची तुलना करत नाही. हे त्यांना कळायला हवे. ज्यांची आम्ही पूजा करतो, ज्यांना आम्ही देव म्हणतो, अशा सर्व दैवतांसोबत आम्ही स्वतःची तुलना करू शकतो का? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत माझी तुलना केलीच नाही. मी केवळ एवढेच म्हणालो होतो की, छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला होता. तर माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला आहे. मी एवढेच म्हणालो होतो. यात तुलना कुठे होते? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. मात्र, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांना वाचवण्यासाठी हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी सत्ताधारी आमदारांवर केला आहे.

