पुणे, दि. ५ फेब्रुवारी २०२५ : पुणे शहरातील निर्जन आणि अंधाऱ्या २७४ ठिकाणी प्रकाशव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या पोलिसांच्या विनंतीनुसार, पुणे महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही करून नवीन पथदिवे बसवण्याचे आणि अक्षम पथदिव्यांचे दुरुस्तीकरण करण्याचे काम पूर्ण केले आहे. या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षा वृद्धी होईल आणि शहरातील निर्जन भागांमध्ये प्रकाशाची सोय निर्माण होईल. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी १ जानेवारी रोजी दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने ही कार्यवाही अंमलबजावणी केली असून, पुढील व्यवस्थेची ग्वाही पत्राद्वारे देखील दिली आहे. यामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डॉ. राजेंद्र भोसले (महानगरपालिका आयुक्त), उपायुक्त (परिमंडळ कार्यालय क्रमांक २), व श्री अविनाश सकपाळ यांचे आभारही मानले.
शहरातील प्रमुख भागांमध्ये कार्यवाही
महापालिकेच्या परिमंडळ कार्यालय क्रमांक २ अंतर्गत शिवाजीनगर-घोलेरोड, कोथरूड-बावधन आणि औंध-बाणेर या तीन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रकाश व्यवस्था सुधारण्याचे काम करण्यात आले. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करून आणि नवीन पथदिवे बसवून प्रकाश यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रातील कामे
- डेंगळे पुलाखाली नवीन पथदिवे बसवून प्रकाशयोजना
- पाटील इस्टेट परिसरातील ब्रिजवर ब्रेकेट लावून उजेड
- आपटे रस्त्यावर आणि रामोशीवाडी परिसरात नवीन पथदिवे
- वाकडेवाडी, जनवाडी, पांडवनगर येथे बंद दिवे सुरू
कोथरूड-बावधन क्षेत्रातील कामे
- सार्थ शिल्प सोसायटी, एकलव्य कॉलेज, परमहंस नगर येथे पथदिवे बसवून प्रकाश व्यवस्था
- गोपीनाथ नगर, परांजपे शाळा ते कमिन्स कंपनी मागील गेट, शिंदे नगर लेन नं. ३ येथे पथदिवे
- चांदणी चौक बस स्टॉप, कोथरूड डेपो, ARAI रोड येथे नवीन पोल
औंध-बाणेर क्षेत्रातील कामे
- पाषाण-सुतारवाडी, बालेवाडी, पाषाण जलशुद्धीकरण केंद्र परिसरात प्रकाशयोजना
- महादेव वाडी, सुसरोड, भाऊ पाटील रोड येथे उजेड
- संजय गांधी लमाणतांडा वसाहत, बोपोडी-आदर्शनगर स्मशानभूमी येथे सीसीटीव्ही आणि प्रकाशयोजना
नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल
पुणे महानगरपालिकेने आधीपासून असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती केली. ज्या ठिकाणी अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाही, तिथे लवकरच ते बसवले जाणार आहेत.
या उपाययोजनांमुळे पुणे शहरातील निर्जन ठिकाणी सुरक्षितता वाढेल. विशेषतः महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे उपक्रम उपयुक्त ठरणार आहेत.