- प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवा
- हाजीअली येथे 1200 क्षमतेचे वाहनतळ उभारा
- नालेसफाईच्या कामात एआयचा वापर करा
- प्रस्तावित प्रकल्पांची निविदा कामे महिन्याभरात पूर्ण करा
मुंबई, 4 मार्च
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सुमारे 1 लाख 41 हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित 25 हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देश दिले.
विधानभवनात झालेल्या या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे सुद्धा उपस्थित होते. मुंबईत महापालिकेच्या वतीने पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रकल्प, आरोग्य विभागाचे सुमारे 1 लाख 41 हजार 356 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये सुमारे 700 किमी किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरणाची कामे, वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्ग, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसह गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल, सायन पूल, बेलासिस पूल, महालक्ष्मी पूल, मढ-वर्सोवा पूल आदी पुलांची कामे, दहीसर, पोईसर, ओशिवरा नदी पुनर्जिविकरण व मिठी नदी स्वच्छता प्रकल्प, यासह पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच वर्सोवा, मालाड, भांडूप, घाटकोपर येथील मलजल उदचन केंद्र, वर्सोवा मलजल बोगदा, मिठी नदी पॅकेज मलजल बोगदा व प्राधान्य मलजल बोगदा या सात मलःनिसारण प्रकल्पांचाही समावेश आहे. याशिवाय आरोग्य विभागाच्या वतीने सायन केईएम, सायन व नायर रुग्णालयांचे पुनर्विकास व नवीन रुग्णालयांची उभारणी, दहिसर पश्चिम द्रुतगती मार्गावरील ऑक्ट्रॉय नाका व मानखुर्द येथे वाहनतळ व व्यावसायिक केंद्र उभारणे या प्रकल्पांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.
निक्षारीकरण प्रकल्प, मिठी नदी पॅकेज 5, पांजरापोळ जलशुद्धीकरण प्रकल्प, दहिसर उद्यान विकास, मानखुर्द वाहतूक केंद्र, जिजामाता उद्यान विस्तारीकरण व मुलुंड पक्षी संग्रहालय, देवनार बायोमायनिंग, देवनार पशुवध आधुनिकीकरण, मध्यवर्ती उद्यान पायाभूत सुविधा व गारगाई पाणी पुरवठा प्रकल्प या सुमारे 25 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला.
हाजीअली येथे 1200 वाहन क्षमतेचे वाहनतळ उभारा : मुख्यमंत्री
छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून या मार्गाच्या परिसरात हाजी अली येथे 1200 वाहन क्षमतेचे वाहन तळ उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे मार्गी लावावीत. प्रस्तावित प्रकल्पांसाठीचे टेंडर कामे महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. भविष्यात मुंबईला पाणी पुरवठ्यासाठी गारगाई प्रकल्प महत्त्वाचा असून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुनर्वसन प्रक्रिया व इतर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्तांच्या कामाचा वेग वाढवा : एकनाथ शिंदे
सध्या बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने 700 किमी रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील सुमारे 2 हजार किमी रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होतील. मुंबईच्या एकूण रस्त्यांपैकी 80 टक्के मुंबई खड्डेमुक्त होईल. त्यामुळे सध्या सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. पावसाळ्यात या रस्ते कामांचा नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच सागरी किनारी मार्गावर हेलिपॅड उभारण्यासंदर्भातही विचार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आदी यावेळी उपस्थित होते. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली.