पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली: हर्षवर्धन सपकाळ

Date:

‘घाशीराम कोतवाल करो सो कायदा’ महाराष्ट्रात चालणार नाही, इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्याचा आका कोण?

इंद्रजीत सावंतांना धमकी देणारा कोणाच्या आशिर्वादाने पोलिसांच्या विश्रामगृहात राहतो.

फिक्सर अधिकाऱ्यांच्या व ते ज्या मंत्र्यांकडे काम करायचे त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत.

मुंबई व महाराष्ट्रातील महत्वाची कार्यालये हलवून महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा मोदींचा प्रयत्न

मुंबई, दि. २६ फेब्रुवारी २५

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवनात पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मध्यंतरी मुंबईत शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता पण त्यातील सत्य बाहेर येऊ नये म्हणून सरकारने आरोपीचा एन्काऊंटर करून प्रकरणातील मुख्य सुत्रधारांना वाचवण्याचाच प्रयत्न केला. सर्वच विषयावर बोलणारे राज्याचे मुख्यमंत्री महत्वाच्या विषयावर मात्र जाणीवपूर्वक गप्प बसतात. पुण्यात झालेल्या बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे. दिल्लीत ११ वर्षापूर्वी एका तरुणीवर बलात्कार झाल्याने समाजातून संतप्त भावना व्यक्त झाल्या होत्या. त्यानंतर मोठे जनआंदोलन झाले होते. पुण्याची घटना ही तितकीच गंभीर आहे. सरकार बेफिकीर असल्याने राज्यात महिला सुरक्षित नाहीत असे सपकाळ म्हणाले.

इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांनी धमकी दिल्याच्या प्रकरणावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सावंत यांना फोनवरून धमकी देताना वापरलेली भाषा व त्याचा आशय पाहता सरकार कोणत्या विचाराच्या लोकांना पुढे करत आहे हे दिसून येते. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील छावा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी काँग्रेसने शिवजयंती दिनी केली होती, पण त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सरसंघचालक गोळवलकर यांनी ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकात संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे तसेच सावरकर यांनीही संभाजी महाराजांबद्ल आक्षेपार्ह लेखन केले आहे. चिटणीसाच्या बखारीपासूनचा जो खेळ सुरु आहे त्याची पाठराखण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची या विषयावर चुप्पी आहे का? आणि छावा चित्रपट प्रमोट करण्यात कुचराई करत आहेत का? हे प्रश्न असताना इतिहासतज्ञ इंद्रजीत सांवत यांना धमकी देत, ‘हे राज्य आमचे आहे’, अशी धमकी दिली, महाराष्ट्रात घाशीराम कोतवालाचे राज्य आहे का? असा संतप्त सवाल करत घाशीराम कोतवाल जर महाराष्ट्राचा गृहविभाग चालवत असतील तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला. इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, हा धमकी देणारा पोलिसांच्या विश्रामगृहावर कसा काय थांबतो? त्याला सुरक्षा कशी पुरवण्यात आली? कोण मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना या व्यक्तीची संपत्ती वाढली हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. घाशीराम कोतवालाचे बगलबच्चे जर धमक्या देत असतील तर ते गंभीर आहे. याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ‘हम करे सो कायदा’ व ‘घाशीराम कोतवाल करे सो कायदा’ हे महाराष्ट्रात चालणार नाही असे सपकाळ म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांकडे पीए, ओएसडी आणि पीएस म्हणून काम करणा-या काही अधिकाऱ्यांना फिक्सर म्हटल्याने सर्वच अधिकाऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे, त्यामुळे हे १६ अधिकारी कोण आहेत व ते कोणत्या मंत्र्यांकडे काम करत होते हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे या मागणीचा पुनरुच्चार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

मुंबईतील पेटंटचे कार्यालय केंद्रातील सरकारने दिल्लीला हलवले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आल्यापासून मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील अनेक महत्वाची कार्यालयाचे राज्याबाहेर हलवली आहेत. यातील बहुतांश कार्यालये गुजरातला हलवली आहेत. पालघर येथे होणा-या सागरी पोलीस मुख्यालय, मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र यासारखी अठरा हून अधिक कार्यालये हलवली आहेत आणि आता पेटंट कार्यालय हलवले जात आहे. मोदींच्या सरकारने महाराष्ट्राची लूट चालवली आहे. राज्याच्या सत्तेत बसलेले मोदी शांह यांचे एजंट या कामी त्यांना मदत करत आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.