बहुजन विरोधी पक्षांपासून सावध राहण्याचे आवाहन
पुणे:-
प्रस्थापित राजकीय पक्षांकडून सातत्याने बहुजनांच्या राजकीय नेतृत्वाबद्दल अपप्रचार केला जातो. बहूजन समाज पक्षासंदर्भात असलेली द्वेषपूर्ण मानसिकता काँग्रेस-भाजप च्या वर्तनातून दिसून येते.असे असताना बीएसपी भाजपची ‘बी टीम’ असल्याचा अपप्रचार करणे कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांना शोभत नाही,असे मत बहूजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (दि.2४) व्यक्त केले.
देशाच्या आयरन लेडी, उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या सुश्री बहन मायावती जी यांनी कॉंग्रेसला त्यांची जागा दाखवण्याचे काम केले आहे.बहुजनांना त्यामुळे संभ्रमित करण्याचे काम काँग्रेस करीत असल्याचा दावा डॉ.चलवादी यांनी केला.विशेष म्हणजे कॉंग्रेस बळकट असलेल्या राज्यात बसपा आणि कॅडर बद्दलची कॉंग्रेसची भावना द्वेषपूर्ण आणि जातीयवादी राहीली आहे. मात्र, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात ज्या ठिकाणी कॉंग्रेस कमकुवत आहे, त्या ठिकाणी राजकीय स्वार्थासाठी बीएसपीला सोबत घेण्याची भूमिका मांडणे, या पक्षाचा दुटप्पी चेहरा दाखवणारा असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
जेव्हाही बहूजन हितार्थ काँग्रेस सारख्या जातीयवादी पक्षांसोबत आघाडी करीत बसपाने निवडणूक लढवली तेव्हा बसपाची मत कॉंग्रेसला ट्रान्सफर झाली. परंतू, कॉंग्रेसची मत बीएसपीला ट्रान्सफर झाली नाहीत. बसपाला त्याचा फटका बसला. भाजप आणि कॉंग्रेसचे चरित्र सदैव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरी अनुयायी , बीसएपी आणि त्यांचे नेतृत्व, दलित-बहूजन अनुयायी तसेच आरक्षण विरोधी राहीले आहे. त्यामुळेच देश संविधानाच्या समता आणि कल्याणकारी उद्दिष्टपूर्ती पासून बराच मागे राहीला असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपची बी टीम म्हणून काम केल नसते तर त्यांची अशी स्थिती झाली नसती.कॉंग्रेसच्या अनेक उमेदवाराचे जामीन जप्त झाले. अशात राहूल गांधी यांनी कुठल्याही मुद्दयांवर विशेषत: बसपा प्रमुख सुश्री बहन मायावती जी यांच्या संदर्भात बोलण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा आणि आपल्या पक्षाच्या अवस्थेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला डॉ.चलवादी यांनी दिला आहे.