पुणे :पैसे घेऊनही वेळेवर फ्लॅटचा ताबा न देणारे, बनावट कागदपत्रे बनवून जागांवर अतिक्रमण करणार्या बांधकाम व्यावसायिकांवर एमपीआयडी नुसार करवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की बनावट कागदपत्रे तयार करुन जमिनीवर अतिक्रमण केल्याबाबत तक्रार आल्यास पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. जागेच्या मालकीचा मुद्दा हा दिवाणी दावा आहे. पोलीस निवाडा करणार नाही़ तर पोलीस जागेचा ताबा कोणाकडे होता, हे पाहून ती स्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
महारेराच्या टाईम लाईन नुसार फ्लॅटचा ताबा देण्याबाबतचे उल्लंघन केले असेल तर फ्लॅट घेण्यासाठी ग्राहकाने दिलेली रक्कम ही गुंतवणूक केल्याचे मानून संबंधितांवर एमपीआयडीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून होणार्या फसवणुकीबाबत नुकतीच क्रीडाईसोबत बैठक घेण्यात आली असून त्यातून काय मार्ग काढता येईल, हे पाहिले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुत्राच्या अपहरणावरुन विचारलेल्या प्रश्नाबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, अपहरण, मिसिंग याकडे संवेदनशीलपणे पहाण्यास सांगण्यात आले आहे. सावंत प्रकरणात पोलिसांकडे जेव्हा अपहरणाची तक्रार आली तेव्हा, पोलीस तातडीने सतर्क झाले. तो अपहरणाचा प्रकार नव्हता, हे नंतर पुढे आले. पण, विमान भारताच्या हद्दीबाहेर गेले असते तर ते पुन्हा परत मागे आणणे अवघड गेले होते. मुलींच्या मिसिंगबाबत अनेकदा आपण स्वत: रस्त्यावर उतरुन शोध घेतला आहे. पोलिसांना कोणी वापरुन घेऊ शकणार नाही. पोलीस ठाण्यात कोणी आका, काका नाही. गुन्हा केला असेल तर त्याला कोणी वाचवू शकणार नाही.
गेल्या वर्षभरात खेळाडुव्यतिरिक्त कोणालाही नवीन शस्त्र परवाने देण्यात आले नाही. गरजेशिवाय तसेच ज्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे व ज्यांनी नुतनीकरण केले नाही, अशा ३०० जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. याशिवाय ४०० जणांना शोकॉज नोटीस देण्यात आल्या आहेत.
पोलिसांना राजकीय, गुंडांचा दबाव नाही़ तर दबाव आहे तो जनतेचा, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. शहरातील वातावरण चांगले असावे, ही जनतेची अपेक्षा आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, याचा दबाव पोलिसांवर आहे.