छत्रपती संभाजीनगर-आज देशभर धार्मिक उन्माद सुरू आहे. राजकारणाचा सोयीसाठी बेधुंद वापर केला जात आहे. याची परिणती धार्मिक संघर्षात होऊ शकते. त्यामुळे भारताच्या ‘गंगा-जमुना’ संस्कृतीला तडा जाऊ शकतो. यासाठी आपला उठाव संविधानाच्या चौकटीत राहून शांततामय मार्गानेच व्यक्त केला तरच भारतात लोकशाहीची पुनर्प्रतिष्ठा होऊ शकते, असे प्रतिपादन १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांनी केले.
छत्रपती संभाजीनगरातील आमखास मैदानावर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मलिक अंबर साहित्यनगरीच्या व्यासपीठावरून डॉ. राणा बोलत होते. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा, मावळते अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष सतीश चकोर, मुख्य निमंत्रक ॲड. धनंजय बोरडे उपस्थित होते.
डॉ. राणा म्हणाले, ‘मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदाची बाब आहे. पण हा दर्जा सदाशिवपेठेतील ब्राह्मणांच्या बोलीपुरता सीमित आहे की महाराष्ट्रातील सर्व विभागातील बोलीभाषांनाही लागू आहे, हे स्पष्ट झाले नाही. वऱ्हाडी, मराठवाडी, खान्देशी, अहिराणी, कोकणी, सातारी आणि कोल्हापुरी या बोलींनाही अभिजात मराठीमध्ये कोणते स्थान आहे हे स्पष्ट झाले नाही. मराठीचे व्याकरण हे सदाशिवपेठेतून लादलेले आहे.’
प्रा. प्रल्हाद लुलेकर, उर्दू साहित्यिक नुरूल हसनैन, सूर्यकांता गाडे, राज्य संघटक किशोर ढमालेही या वेळी उपस्थित होते. शीतल गावित यांचे अखंड गायन, अमृत भिल यांचे पावरीवादन, नरेंद्र राठोड यांचे कबीराचे अभंग आणि डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या छक्कडचे सादरीकरण झाले. डॉ. किशोर शिरसाटांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वैशाली डोळस यांनी आभार मानले.
अ. भा. साहित्य संमेलन दिल्लीत घेण्यात आले. चुकून त्यांनी तारा भवाळकर यांची निवड अचूक केली. मात्र, ते साहित्य संमेलन नसून भाजपचे अधिवेशन झाले.. इथे चिमुकल्या मुलींवर बलात्कार होत आहेत अन् मुख्यमंत्री मात्र कार्यक्रमांत व्यग्र आहेत. माणसाच्या हृदयातील राम यांना दिसत नाही. रामाचे नाव घेत फिरणारे हे मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत. विद्रोहच समानतेचे बीज रुजवू शकतो, असे वासुदेव मुलाटे म्हणाले.
महात्मा फुलेंना ग्रंथसभेने जेव्हा पहिल्यांदा आमंत्रित केले तेव्हा ते म्हणाले होते की, ‘तुमचे संमेलन दुहीचे बीज रोवणारे आहे. अखिल मानवाला एकत्र धरणारे संमेलन हवे तेव्हाच मी येईन.’ एका विशिष्ट जातीच्या लोकांना आमचा विरोध नाही, तर त्यांच्या विचारधारेला आमचा विरोध आहे. ‘विषमतेला नकार, समतेला होकार’ हे आमचे ब्रीद आहे. असे सांस्कृतिक चळवळ अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी सांगितले.
सामाजिक विषमता समानतेमध्ये रूपांतरित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न गरजेचे आहेत. अलीकडे बेमालूमपणे पाठ्यपुस्तकातून मनुस्मृती रुजवण्याचे काम सुरू झाले आहे. याकडे सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे अन् विरोध करणे गरजेचे असल्याकडे स्वागताध्यक्ष चकोर यांनी लक्ष वेधले.