काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला
संजय राऊत यांनी संमेलनाचे संयोजक संजय नहार यांना फोन करून आपली नाराजी केली व्यक्त
मुंबई-शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर ठाकरे गटातील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र पाठवत नाराजी व्यक्त केली आहे.

काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांनी संमेलनात सहभागी होण्यासाठी सदस्यांना 50 लाख तर आयोजकांना एक मर्सिडीज दिल्याची चर्चा बाहेर सुरू असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
नीलम गोऱ्हे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. संजय राऊत यांनी संमेलनाचे संयोजक संजय नहार यांना फोन करून आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे. यावर राजकारणासाठी साहिते संमेलन मंचांचा वापर टाळला पाहिजे, अशी प्रतिक्रिया नहार यांनी दिली आहे.
दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय?
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय? सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर महामंडळाने त्वरित माफी मागावी.
नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, “मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले.”
हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे.