15 मे पर्यंत निकाल लागण्याची शक्यता,राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक
मुंबई-महाराष्ट्रात आता उद्यापासून दिनांक 11 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या एकूण संख्येपैकी 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुली आहेत. या परीक्षेला 37 तृतीयपंथी नागरिकांनी देखील नोंदणी केली आहे.
महाराष्ट्रात एकूण 10 हजार 550 कनिष्ठ महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 3 हजार 373 मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. विज्ञान शाखेला 68 हजार 967 विद्यार्थी, कला शाखेला तीन लाख 80 हजार 410 विद्यार्थी, वाणिज्य शाखेला तीन लाख 19 हजार 439 विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम 31 हजार 735 विद्यार्थी आहेत. टेक्निकल सायन्स 4 हजार 486 असे एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत, अशी माहिती माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी बोलताना शरद गोसावी म्हणाले, पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळा अंतर्गत बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा 10 दिवस अगोदर होत आहे. ही परीक्षा लवकर घेतल्याने निकाल लवकर लागेल, 15 मे पर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
पुढे बोलताना शरद गोसावी म्हणाले, परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली. तर मागील पाच वर्षाच्या काळात 818 केंद्रावर सातत्याने गैरप्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे ती सर्व केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्याबाबत सांगायचे झाल्यास, पुणे 125, नागपूर 104, छत्रपती संभाजीनगर 205, मुंबई 57, कोल्हापूर 39, अमरावती 124, नाशिक 88, लातूर 73, कोकण 3 ही एकूण 818 केंद्र आहेत. या सर्वांवर विशेष लक्ष मंडळाचे असणार असल्याचे शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्य शासनाकडून कॉपीमुक्त अभियनासाठी परीक्षा केंद्रावर ड्रोन फिरवले जाणार आहेत. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची एफसीआरव्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

